बेळगाव - कोळशाचा पुरेसा साठा नसल्यामुळे औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असली बेळगाव शहर आणि परिसरातील वीज पुरवठ्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम सध्या तरी होणार नाही. ही माहिती हेस्कॉमतर्फे देण्यात आली. मात्र येणाऱ्या दिवसात कोळशाचा मुबलक प्रमाणात पुरवठा न झाल्यास काही प्रमाणात भारनियमन होण्याची शक्यता आहे.
कर्नाटक राज्यात तीन औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प आहेत. रायचूर व बळ्ळारी येथील प्रकल्पांमधून मोठ्या प्रमाणात वीज मिळते. तसेच यरमारस येथील प्रकल्पामधून देखील काही प्रमाणात विजेचा पुरवठा होतो. त्यामुळे औष्णिक प्रकल्पांमुळे राज्याच्या विविध भागात वीज पुरवठा केला जातो. अनेकदा जलविद्युत प्रकल्पामधून कमी प्रमाणात वीज पुरवठा होत असल्यास औष्णिक प्रकल्प फायदेशीर ठरतात. मात्र राज्यासह देशात कोळशाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असल्याच्या बातम्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागेल, अशी चर्चा होऊ लागली आहे.
याबाबत हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांची संपर्क साधला असता अजूनपर्यंत विजेचा कमी प्रमाणात पुरवठा केला जाईल, अशी कोणतीही माहिती आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी भारनियमनाची चिंता करू नये, असे मत व्यक्त होत आहे. सोशल मीडियावरून वीजसंकट निर्माण होणार असल्याची माहिती दिली जात असली तरी यावर कोणी विश्वास ठेवू नये. भारनियमन करायचा असल्यास अगोदर माहिती ग्राहकांना दिली जाते. यावर्षी राज्यात मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने सर्व धरणांमध्ये पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे जलविद्युत प्रकल्पमधूनही अधिक प्रमाणात विजेचा पुरवठा होत आहे. ‘विंडमिल एनर्जी’ प्रकल्पांमधूनही वीज उपलब्ध होत आहे. औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांमधून कमी वीज उपलब्ध झाली तरी भारनियमन होण्याची शक्यता कमी आहे.
विजेचा पुरेसा पुरवठा होत असून सध्या तरी भारनियमन किंवा इतर प्रकारची कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. अधिक माहिती आली तर त्याबाबत सर्वांना कळविले जाईल.
- एम. टी. अप्पण्णावर, शहर अभियंता
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.