निपाणी ( कोल्हापूर ) - गेल्या तीन दिवसापासून कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यामध्ये एकमेकांच्या विरोधात विधाने, तिरडी मोर्चा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात परिस्थिती स्फोटक निर्माण झाली आहे. या काळात अनुचित घटना टाळण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा भागातील आंतरराज्य बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. दोन्ही राज्यातील आगारांनी एकमेकांच्या राज्यात असलेली बस सेवा पूर्णपणे बंद केली आहे.
शनिवारी रात्री महाराष्ट्रातील कोल्हापूर कागल आगाराच्या काही बस निपाणी आगारात तर निपाणी आगारातील काही बस कोल्हापूर आगारात मुक्कामास होत्या. मात्र निपाणी आगारातील सर्व बस सुरक्षितपणे निपाणी आगारात आणण्यासाठी येथील आगार प्रमुखांना यश आले आहे. मात्र कोल्हापूर आगाराच्या काही बस निपाणी आगारात असून त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली आहे. दोन्ही राज्यातील तणाव वाढण्याची शक्यता असल्याने आंतरराज्य बस सेवा पूर्णपणे बंद झाली आहे. त्याचप्रमाणे निपाणी आगारातून कोल्हापूर ,इचलकरंजी, गडहिग्लज, कागल, हुपरी, मुरगुड आणि परिसरात जाणाऱ्या सर्व बस बंद ठेवण्यात आली आहे. तसेच केवळ कोगनोळी स्थानिक बस सोडण्यात येत असून कागलपर्यंतची सर्व वाहतूक बंद झाली आहे.
रविवारी सकाळी सात वाजल्यापासून सेवा खंडित झाल्याने प्रवाशांसह व्यावसायिकांची मोठी कोंडी झाली आहे. कोल्हापूर बेळगाव मार्गावरील महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वच बस बंद असल्याने त्याचा परिणाम निपाणी बस स्थानकातील जाणवला. त्या पार्श्वभूमीवर येथील बस स्थानकात सकाळी आठ वाजल्यापासूनच खासगी वाहनांचा वापर करून प्रवासी कागल, कोल्हापूर गाठत होते. रविवारी ही बससेवा बंद असल्याने शासकीय नोकरदारांना दिलासा मिळाला. मात्र कागल, गोकुळ, शिरगाव, कोल्हापूर एमआयडीसी येथे जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची मात्र मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर थांबून मिळेल त्या वाहनाने कर्मचारी कामाच्या ठिकाणी पोहोचत होते. तणावाच्या पार्श्वभूमीवर मंडल पोलीस निरीक्षक संतोष सत्यनायक त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसस्थानकासह कोगनोळी टोल नाका आणि सीमाभागात चोख बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्रातील बस कर्नाटकात सोडल्याशिवाय आपणही कर्नाटकाच्या बस कागल कोल्हापूर पर्यंत सोडणार नसल्याचे निपाणी आधार प्रमुख मंजुनाथ हडपद यांनी सांगितले.
दरम्यान, भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करून शिवसेनेने शनिवारी सकाळी कागल कोगनोळी सीमेवर शिर्डी मोर्चा कडून पुतळ्याचे दहन केले होते. त्यानंतर बेळगाव येथेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते, तर बसवराज होरटी यांनीही अक्षेपार्ह विधान केल्याने कर्नाटक महाराष्ट्रातील सीमाभागात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सीमाभागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निपाणी, कोगनोळी परिसरातही पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.