कोल्हापूर - गेल्या महिनाभरात कमी-अधिक प्रमाणात पडणाऱ्या थंडीचा कडाका पाच दिवसांत वाढला आहे. रात्रभर बोचरी थंडी, दिवसभर झोंबणारा गारवा अशा संमिश्र वातावरणाचा काही जण आनंद घेत आहेत. काही जण हुडहुडी असह्य होत असल्याने गरम कपड्यात वावरण्याबरोबर थंडी टाळून व्यवहार करण्याला प्राधान्य देत आहेत.
शहरातील सार्वजनिक स्थळांवर पहाटेच्या वेळी फिरायला येणाऱ्यांची संख्या एरव्ही लक्षवेधी असते. यातूनही जे लोक फिरायला येतात त्यांच्यापैकी अनेक जण स्वेटर, मफलर घालूनच थंडीपासून बचाव करीत फिरण्याचा आनंद घेत आहेत. एसटी चालक-वाहक दीर्घपल्ल्याच्या मार्गावर एखाद्या चहा गाडीवर थांबून चहा घेऊन पुढे जातात तर अग्निशामक दलाच्या कक्षासमोर रात्रभर तसेच पहाटे शेकोटी पेटवून जवान थंडीपासून बचाव करीत सेवेसाठी सतर्क राहतात.शेती उत्पन्न बाजार समितीत रोज पहाटे शेतीमाल घेऊन येणाऱ्या गाड्या मध्यरात्रीच येत आहेत. त्यानंतर बहुतेक शेतकरी वाहनधारक सौदे स्थळी येताच चहाच्या गाडीवर चहा घेऊन सौद्यासाठी जातात. यात रोज सौदे अर्धा तास ते एक तास उशिरा सुरू होऊन उशिरा संपत आहेत. सौदे झालेल्या शेतीमालाची शक्यतो दिवसभर उन्हाच्या वेळीच वाहतूक केली जाते .थंडीमुळे सर्दी, खोकला, कान, दात दुखणे आदी लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत. खासगी क्लिनिक तसेच सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे, अशी माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.
शहरातील तापमान आठवडाभरापासून कमाल ३१ ते ३५ अंश इतके कमी-अधिक होत आहे. किमान तापमान १८ अंश इतके खाली येत आहे. रात्री दहा ते पहाटेपर्यंत कमाल तापमान १२ ते १५ अंशांपर्यंतच टिकून राहते. या काळात सर्वाधिक थंडी जाणवते. दुपारी बारा ते साडेतीन या वेळेत तापमान ३२ ते ३५ अंशापर्यंत असते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.