कुणाला हृदय द्यायचे आहे का ? 'यांना' आहे गरज

Donate The Heart To Save Two Children Life
Donate The Heart To Save Two Children Life

सांगली - तीन एसटी बसमधून उद्या (ता. 13) 85 मुलं मुंबईच्या दिशेनं रवाना होतील. या बसमध्ये दोन मुलं अशी असणार आहेत ज्यांना हृदय हवंय. ते कधी मिळेल माहिती नाही, मात्र ती जगण्याची संघर्षाच्या यादीत आपलं नाव नोंदवून येणार आहेत. त्यांचं हृदय आता फारकाळ काम करू शकणार नाही. याच बसमध्ये 83 मुलं अशी आहेत, ज्यांच्या हृदयाला छिद्र आहेत. ती सारी जगण्याची उमेद घेऊन नव्या लढाईला सज्ज झाली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ती मुंबईतील एसआरसीसी रुग्णालयात दाखल होतील. 

जिल्हा परिषद आरोग्य सभापती तम्मनगौडा रविपाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेला एक हळवी किनार होती. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी होते. उद्या जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत या मुलांना मुंबईला पाठविण्यात येणार आहे.

"ब्रेन डेड' मुलाच्या हृदयाची गरज

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांच्या आरोग्यविषयक समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 32 पथके कार्यरत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या समस्या असलेल्या मुलांना शोधून त्यांच्या तपासण्या पूर्ण करून घेतल्या. धक्कादायक माहिती हाती आली आणि सारी यंत्रणात थबकली. कारण, यावर्षी हृदयरोग असलेल्या चिमुरड्यांची संख्या तब्बल 85 इतकी आहे. सारी मुले 3 ते सहा वयोगटात आहेत. पैकी दोन चिमुरड्यांचे हृदय काही काळाने काम करणे बंद करेल, मात्र त्याआधी त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली तर ती पुन्हा भरारी घेऊ शकतील. अर्थात, त्यांच्या त्या आनंदाला एक वेगळी दुःखाची किनार असणार आहे. कारण, जो बालरुग्ण "ब्रेन डेड' म्हणजे मेंदूचे काम बंद पडल्याने मृत्यूच्या दारात उभा असेल त्याचेच हृदय या मुलांसाठी उपलब्ध होऊ शकेल. 

पाच दिवसाचं बाळ तातडीनं पाठवलं 

मिरज येथील रुग्णालयात पाच दिवसांपूर्वी जन्माला आलेल्या एका बाळाला हृदयाच्या दोनऐवजी एकच कप्पा आहे. त्यामुळे त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया आवश्‍यक होती. त्यासाठी आवश्‍यक निधीला मंजुरी मिळवण्यात वेळ गेला असता. त्याची प्रतिक्षा न करता सीईओ अभिजित राऊत यांनी आदेश दिले आणि बाळाला तत्काळ मुंबईला रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे त्याच्यावर अन्य प्राथमिक उपचार करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे. 

नात्यातील लग्न 

एका जिल्ह्यात शून्य ते सहा वयोगटातील 83 मुलांना हृदयविकार असल्याचं निदान होणं हे गंभीर आहे. त्याच्या कारणांच्या मुळाशी जाताना आरोग्य विभागाने "नात्यातील लग्न' या मुद्याकडे जास्त लक्ष वेधले आहे. बहुतांश रुग्णांमध्ये हेच कारण प्रकर्षाने समोर आले आहे. याशिवाय, प्रसुतीच्या काळातील आजारही कारणीभूत ठरले आहेत. 

अडीच ते आठ लाख खर्च 

हृदय शस्त्रक्रियेसाठीचा एकूण खर्च अडीच ते आठ लाख रुपयांपर्यंत होणार आहेत. ओपन हार्ट सर्जरीसाठीचा खर्च सर्वाधिक आठ लाखापर्यंतचा आहे. हा सर्व खर्च राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमातून केला जाणार आहे. 
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com