कमान पाडणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी बौद्ध समाजाने गाव सोडून मंत्रालयावर लाँग मार्च काढला.
आरग : येथे स्वागत कमान पाडल्याप्रकरणी विविध आंदोलनांच्या मालिकांमुळे राज्यभर चर्चेत असलेल्या बेडग ग्रामपंचायतीची वार्षिक ग्रामसभा आज मंगळवारी (ता. २९) होत आहे.
यंदाच्या ग्रामसभेत स्वागत कमान प्रश्नावर प्राधान्याने चर्चा करून प्रस्ताव सादर करण्याबाबत जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला पत्र आले आहे. त्यामुळे वादविवादाचे कारण ठरलेल्या स्वागत कमान प्रश्नावरून बेडगची ग्रामसभा (Bedag GramSabh) वादळी होण्याची शक्यता आहे.
बेडगेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची निर्माणाधिन स्वागत कमान (Babasaheb Ambedkar Welcome Arch Dispute) अनधिकृत ठरवून पाडल्याप्रकरणी दोन समाज आमने-सामने आले होते. कमान पाडणाऱ्या दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी बौद्ध समाजाने गाव सोडून मंत्रालयावर लाँग मार्च काढला.
कमानीचा विषय पेटल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याची दखल घ्यावी लागली. उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दलित समाजाशी चर्चा करून शासनखर्चातून पुन्हा नव्याने कमान बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी निधीची तरतूद झाली. आता ग्रामसभेत कमानीचा ठराव मंजूर झाल्यानंतर स्वागत कमान बांधली जाणार आहे.
ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी बेडग ग्रामपंचायतीला पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वागत कमान उभारणीसाठी निधी उपलब्ध करण्याबाबत पत्र आले आहे. त्यामुळे बेडग ग्रामपंचायतीने ग्रामसभेत स्वागत कमानीच्या प्रश्नावर प्राधान्याने चर्चा करावी.
ग्रामसभेत मागील इतिवृत्ताचे वाचन, माझी वसुंधरा अभियान, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, लाभार्थी निवड या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे. मात्र राज्यभरात चर्चा झालेल्या बेडगेतील स्वागत कमानीबाबत नेमका काय निर्णय होणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सध्या इथं पोलिस बंदोबस्त तैनात आहे.
बेडगेतील राजवाडा चौकात ग्रामसभा होणार आहे. स्वागत कमान कोठे व कशी उभी करायची, कमानीचा आराखडा काय असेल, त्यावर कोणकोणत्या महापुरुषांच्या प्रतिमांचा समावेश करावा, यावर चर्चा केली जाणार आहे.