सांगली - सहकार्य कराराअंतर्गत संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात संशोधन केंद्र सुरु करण्याचा मनोदय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे यांनी आज व्यक्त केला. महाविद्यालयाच्या आठव्या पदवीदान समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, खासदार संजय पाटील, महाविद्यालयाचे संचालक जी.व्ही.पारीषवाड उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते.
स्वातंत्र्यपूर्व काळात तंत्रशिक्षणाचा पाया घालणारे वालचंद अभियांत्रिकी महाविद्यलयाला राज्य शासनाने गुणवत्तेच्या आधारे स्वायत्त महाविद्यालय म्हणून मान्यता दिली आहे. त्यानुसार महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि शिवाजी विद्यापीठातर्फे संयुक्तपणे बीटेक आणि एमटेक पदवी दिली जाते. आज बीटेकच्या 431 तर एमटेकच्या 233 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ भामरे म्हणाले, ''वालचंद महाविद्यालयाला नेव्हीने पन्नास लाख रुपये शिष्यवृत्तीचा संशोधन प्रकल्प देऊ केला आहे. डीआरडीओच्या देशभरात 54 प्रयोगशाळा आहेत. 41 दारु गोळा कारखाने आहेत. संरक्षण क्षेत्रात स्वयंपुर्णता गाठण्यासाठी या क्षेत्रात खासगी उद्योजकाना प्रोत्साहन देणारी धोरणे स्विकारली आहेत. देशातील सर्व आयआयटी आणि डीआरडीओमध्ये सहकार्य करार आहेत. त्याप्रमाणेच देशातील गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या वालचंद महाविद्यालयाशीही डीआरडीओ सहकार्य करारान्वये जोडले जाईल.''
श्री गुलाबचंद म्हणाले, ''अभियंत्यासाठी आता जगभरात संधीची कवाडे खुली झाली आहेत. विशेषतः अभियांत्रिकी क्षेत्राची पुढची वाटचाल जीवनाची सर्व क्षेत्रे व्यापणारी असेल. त्यामुळे आजचा अभियंता केवळ एका क्षेत्राचा जाणकार असून चालणार नाही. जर आपल्याला कृत्रिम ह्दय बनवायचे असेल तर त्या अभियंत्याला जीवशास्त्राचेही ज्ञान गरजेचे असेल. अभियांत्रिकीची ही व्याप्ती सतत वाढत जाणारी असून यापुढच्या आयुष्यात सतत नवे शिकण्याची तयारी ठेवा. ''
डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, ''आजच्या अभियंत्यापुढे सौर उर्जा, पर्यावरण, सायबर क्राईम, कार्बन उत्सर्जन, जल प्रदुषण अशा विविध क्षेत्रात संशोधनाची आव्हाने आहेत. ती अभियंत्यानी स्विकारावीत.'' खासदार पाटील म्हणाले, ''आपल्या शिक्षणाचा कुटुंब आणि समाजासाठी उपयोग झाला पाहिजे. हे ध्येय्य ठेवूनच विद्यार्थ्यांनी जीवनाच्या विविध क्षेत्रात जावे.''
महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या या आटोपशीर शिस्तबध्द कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा.अनुश्री कुलकर्णी आणि प्रा.एन.जी.आपटे यांनी केले.
वालचंदचे शाखानिहाय टॉपर्स -
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.