कोरडे आभाळ अन् काळवंडलेले चेहरे

Drought
Drought

सांगली - रणरणत्या उन्हाच्या कडाक्‍यात येथील दुष्काळ आणखी भीषण भासतो. ४१ अंश सेल्सिअसचा पार केलेला पाऱ्याचे चटके जमिनीला तर लागत आहेतच, पण मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात दुष्काळची दाहकता स्पष्ट होत आहे. कोरड्या ठक्क आभाळाखाली उन्हा-तान्हात फिरणाऱ्या शेळ्या मेंढ्या, काळवंडलेले चेहरे. आणि टॅंकरच्या प्रतीक्षेत असणाऱ्या माय माउल्यांचे चेहरे यंदाची स्थिती स्पष्ट करीत आहेत. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर आटपाडी तालुक्‍यातील परिस्थितीचे हे चित्र.

मे महिन्याचं ऊन तापले आहे. तापमानाचा पारा ४१ अंशांपार गेला आहे. अशा स्थितीत दरवर्षी पाचवीला पूजल्याप्रमाणेच यंदाही सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, खानापूर, तासगाव, कडेगाव तालुक्‍यात दुष्काळाचे चटके जाणवायला लागले आहेत. तर जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही अशी गंभीर परिस्थिती या तालुक्‍यात पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर आटपाडी दुष्काळी तालुक्‍याचा दौरा केला. दुष्काळाचे गंभीर रूप येथे पहायला मिळाले.

तालुक्‍यातील सुमारे २५ हून अधिक गावात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. तर २०० हून अधिक वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टॅंकर प्रशासनाने सुरू केले आहेत. टेंभू योजनेचे पाणी या तालुक्‍यात पोचले आहे.

मुख्य कालव्यातून पाणीपुरवठा सुरू आहे; मात्र या मुख्य कालव्याचा फायदा फक्त आटपाडी तालुक्‍यातील २५ ते ३० टक्के भागालाच होतो आहे. पोट वितरिका, कालवे, बंदिस्त पाइपलाइन यांची कामे अद्यापही अपुरी असल्याने या योजनेचे पाणी तालुक्‍यात इतर ठिकाणी देता आले नाही.

तालुक्‍यातील काही गावे योजनेत समाविष्ट नसल्याने या गावातही योजनेचे पाणी पोचले नाही. खरसुंडी, नेलकरंजी परिसरातील काही गावांत पाणी पोचले आहे. तेथे थोडीफार हिरवळ दिसू लागली आहे; मात्र उर्वरित तालुका पाण्यासाठी टाहो फोडतो आहे.

दुष्काळाचे दाहक चित्र आटपाडीच्या बाजारात
आटपाडीच्या आठवडी बाजारात दुष्काळाचं दाहक चित्र अनुभवायला मिळालं. शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या या बाजारात मातीमोल दराने विक्री होत आहे. शेळ्या मेंढ्यांची आवकही दुष्काळामुळे वाढली आहे. लहान कोकरे विक्रीसाठी दिसली. शाळूच्या कडब्याचा दरही आवाक्‍याबाहेर आहे. शेकडा अडीच हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत दर वाढला आहे. त्यामुळे आधीच पाणी टंचाईने मेटाकुटीला आलेला शेतकरी या दराने हबकला आहे. सोलापूर, नळदुर्ग भागातून ट्रकमधून कडबा विक्रीसाठी आणला आहे. चारा नाही, पाणी नाही, शेती ओस पडली आहे. अशा परिस्थितीत माणसांना प्यायला पाणी नाही. तर जनावरं कशी जगवायची या विवंचनेत इथला शेतकरी दिसला. व्यापारीही शेळ्या-मेंढ्यांचा दर पडल्याने चिंतित दिसले. 

दिघंची परिसराला टॅंकरचा आधार
दिघंची परिसरात पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू आहेत. पण त्याचा फेऱ्याही नियमित होत नसतात. दिघंचीकरांनी टेंभूच्या पाण्यामुळे डोळे लावले आहेत. विठ्ठलापूर, पुजारवाडी, उंबरगाव, पिंपरी, शिवपुरी-कुटे वस्ती या परिसरात भीषण पाणीटंचाई आहे. विभूतवाडी-गोळेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी पाणीच नसल्याने उभ्या द्राक्षबागा सोडून दिल्या आहेत. कर्जाचा डोंगर करून या बागा उभ्या केल्या, बागा सोडून इथले शेतकरी पोट भरण्यासाठी मुंबई-पुण्याला स्थलांतरित झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com