मंत्रीमंडळ विस्तारानंतर `या` जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

मंत्रीमंडळ विस्तारानंतर `या` जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

पंढरपूर : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात सोलापूर जिल्ह्यातील एकाही आमदाराला स्थान न मिळाल्याने जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः, शिवसेनेचे नेते आमदार तानाजी सावंत यांनाही ऐनवेळी डावलल्याने शिवसैनिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तर, पंढरपुरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही आमचा अपेक्षाभंग झाल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. एकूणच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर आळवला जात आहे. 

विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात नव्याने जुळून आलेल्या राजकीय समीकरणामुळे अनेक राजकीय उलथापालथ झाली. राजकीय उलथापालथमध्ये सोलापूर जिल्ह्यातील आमदार बारीक लक्ष ठेवून होते. 

राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके आणि भूम-परांडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के मानले जात होते. शिवसेनेचे तानाजी सावंत यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीची पूर्ण जबाबदारी टाकली होती. यात तानाजी सावंत काही प्रमाणात यशस्वी देखील झाले. 


रविवारी (ता. 30) रात्रीपर्यंत तानाजी सावंत यांचे नाव मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीत फिक्‍स होते. परंतु ऐनवेळी डावलण्यात आल्याने तानाजी सावंत कमालीचे नाराज झाले आहेत. तानाजी सावंतांना डावलल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमधूनही नाराजी व्यक्त केली जात आहे. 

जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीवर लक्ष 
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचेही नाव सुरवातीपासून आघाडीवर होते. भालकेंना सोलापूरचे पालकमंत्रिपद मिळणार, याविषयी सोशल मीडियातून वारंवार चर्चा सुरू होती. आमदार भालकेंना मंत्रिमंडळात घ्यावे यासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना साकडे घातले होते. पवारांनीही भालकेंविषयी सहानुभूती दाखवली होती. परंतु निवडणुकीपूर्वी आमदार भालकेंच्या तळ्यात-मळ्यातील राजकीय भूमिकेमुळे त्यांचे नाव ऐनवेळी कट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आमदार बबनराव शिंदे यांच्याबाबतही हाच नियम लागू झाल्याने आमदार बबनराव शिंदेंच्याही नावाचा विचार होऊ शकला नाही. आमदार भारत भालके, बबन शिंदे आणि शिवसेनेचे नेते तानाजी सावंत यांची संधी हुकल्याने त्याचा जिल्ह्याच्या राजकारणावर विशेषतः उद्या होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर काय परिणाम होणार, याकडेच लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com