धरणे भरली तरी शेतकरी अडचणीतच

Farmers are in trouble even though the dam is full
Farmers are in trouble even though the dam is full


श्रीगोंदे (नगर): यंदाचा पावसाळा जास्त दिवस राहिल्याने कुकडी प्रकल्पासह घोड धरण "ओव्हर-फ्लो' झाले. आजही धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा आहे. लाभक्षेत्रातील शेतीला पाण्याची गरज आहे; मात्र आवर्तनाचे नियोजन अजूनही झालेले नाही. त्यामुळे दर वर्षी धरणात साठा कमी असल्याने अडचणीत येणारा शेतकरी यंदा धरणे भरली असतानाही अडचणीत सापडत आहे. 


गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कुकडी व घोड प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी कुकडी प्रकल्पात साडेअकरा टीएमसी, म्हणजे 39 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. घोड धरणात दोन टीएमसी, म्हणजे 38 टक्के पाणी होते. यंदा मात्र जास्त चांगली स्थिती आहे. आज "कुकडी'त 27.5 टीएमसी, म्हणजे 94 टक्के उपयुक्त पाणी आहे. "घोड'मध्येही जवळपास पावणेपाच टीएमसी, म्हणजे 98 टक्के उपयुक्त पाणी आहे. 

एकीकडे धरणे भरली असतानाही रब्बी हंगामात अजून एकही आवर्तन झालेले नाही, अथवा तसे नियोजनही नाही. "कुकडी' पट्ट्यात ज्वारीसह कांदा, गहू, ऊस, हरभरा व फळबागा आदी पिके जोमात आहेत. काही दिवसांपर्यंत पाण्याची गरज नव्हती; मात्र आता पाण्याची आवश्‍यकता वाढली आहे. कुकडी व घोड धरणांच्या आवर्तनाचे नियोजन करण्यासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक घ्यावी लागते; मात्र जलसंपदा विभागाकडून त्याबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही. 
आमदार बबनराव पाचपुते यांनी आजारी असतानाही "कुकडी' व "घोड'च्या आवर्तनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने बोलाविण्याची मागणी केली आहे. मात्र, त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे दिसते. 

"घोड'च्या पाण्यावर लक्ष ठेवा 
घोड धरणातील पाण्याची गळती आणि चोरी दर वर्षी चिंतेचा विषय आहे. धरणे भरलेली असतानाही शेवटी अडचणी येतात, हे लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी गळती व चोरीकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. 

पाणीअर्ज भरून द्यावेत 

आवर्तनाचा प्राथमिक सिंचन आराखडा पाठविला आहे. कुकडी व घोड धरणातून तीन आवर्तने होतील, अशी स्थिती आहे. या महिनाअखेरपर्यंत पाण्याचा निर्णय होऊन आवर्तन सोडले जाईल, अशी शक्‍यता असून, वरिष्ठ त्याबाबत प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनीही पाणीअर्ज भरून द्यावेत. 
- स्वप्नील काळे, कार्यकारी अभियंता, "कुकडी' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com