डोंगरांवर आगी लागण्याचे प्रमाण वाढले; वणव्यांमुळे निसर्गसौंदर्य काळवंडले

fire in forest nature beauty down in shirala kolhapur
fire in forest nature beauty down in shirala kolhapur

शिराळा (सांगली) : शिराळा तालुक्‍याला निसर्गाने सौंदर्याचा खजिना बहाल केला आहे. पावसाळा व हिवाळ्यात नजरेत भरणारे नैसर्गिक सौंदर्य सध्या डोंगरांना लावल्या जाणाऱ्या आगींमुळे उन्हाळ्यात काळवंडून गेले आहे. डोंगर संपत्तीची ही आपली संपत्ती समजून लागलेली आग विझवण्यापेक्षा ती लागूच नये याची खबरदारी घेतली तर शिराळा तालुक्‍याचे निसर्ग सौंदर्य अबाधित राहील. 

जानेवारी ते जून दरम्यान दररोज कोणत्या ना कोणत्या तरी डोंगराला आग लागलेली दिसते. आता तर दररोज एका डोंगराला आग लागलेली दिसते. या आगीत होरपळून मरणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्या कागदोपत्री नोंद होत नाही. त्याची दखल घेतली जात नसली तरी कितीतरी मुक्‍या सरपटणाऱ्या व तृणभक्षी प्राणी, कीटकांचा मृत्यू होतो. त्याचाही विचार करण्याची गरज आहे.

शिराळा तालुका डोंगरी आहे. डोंगरांवर मोठ्या प्रमाणात गवत असते. गवत कापून शेतकरी जनावरांसाठी वैरण म्हणून आणतात. पण सर्वच गवत काढले जाते असे नाही. जेवढी गरज आहे तेवढे आणून उर्वरित डोंगरातच होळी रचून ठेवले जाते. हज वाटेने जाताना काहीजण गंमत म्हणून उभ्या गवतावर जाता जाता काडी अथवा ओढलेली विडी, सिगारेट टाकतात. त्यामुळे आग लागते. हा हा म्हणता शेकडो एकरांतील गवताचा कोळसा होतो. त्यामुळे रानात चरावयास जाणाऱ्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो.

डोंगर कपारी व चांदोली राष्ट्रीय उद्यानातही गवताचे प्रमाण जास्त आहे. त्या ठिकाणीही अनेकवेळा आगी लावल्या जातात. दरवर्षी कोणत्या कोणत्या ठिकाणी आगी लागलेल्या दिसतात. ती आग लागली की लावली हा संशोधनाचा विषय असतो. मात्र त्या आगीत कीटक, सरपटणारे प्राणी, लहान वनस्पती, झाडे, झुडपे जळून खाक होतात. उद्यानातील आगीमुळे अनेक प्राणी व पशु-पक्ष्यांना भेदरलेल्या अवस्थेत पळावे लागते.

गैरसमजुतीतून आगी, प्रमाणातही वाढ

पुढील वर्षी गवत चांगले यावे म्हणून अनेक शेतकरी स्वतः रानातील गवताला आग लावतात. त्यांनी लावलेली आग त्यांच्या गवत, शेतापुरती मर्यादित रहात नाही. इतरांच्या गवताच्या रानात जाऊन त्या परिसरातील गवत जळून खाक होते. काही तर जाता जाता मजा म्हणून उभ्या गवतात काडी टाकून उडालेला भडका पाहतात.

डोंगररांगांमुळे आग नियंत्रणा बाहेर

शिराळा हा डोंगरी तालुका आहे. सलग डोंगर असल्याने एखाद्या ठिकाणी आग लागली तर ती डोंगर माथ्यावरून पसरते. दिवसा लागली तर उन्हाच्या झळा व रात्री असेल तर वारा यामुळे आग आटोक्‍यात येत नाही. त्यामुळे रात्रंदिवस डोंगर धुमसत राहतात.

मदतीचा अभाव

डोंगराला आग लागली की वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनीच विझवावी अशी समजूत आहे. खासगी क्षेत्रात लागली तर ज्यांच्या गवताच्या होळ्या आहेत ते लोक आग विझवायला जातात. उर्वरित लोक फक्त आग पाहतात. आग विझवणे ही सामूहिक जबाबदारी आहे ही भावना निर्माण होणे गरजेचे आहे. तरच वणवे रोखण्यात यश येईल.

"वनविभागाने कार्यक्षेत्रात असलेल्या वनीकरणात जाळरेषा काढली आहे. परंतु ती जाळरेषा सर्वच लोकांनी आपापल्या गवताच्या रानात काढल्या तर इतरांचे नुकसान होणार नाही. चुकून एखाद्या ठिकाणी आग लागली तरी ती त्या क्षेत्रापुरती मर्यादित राहील.  जाळरेषेने इतरांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होईल."

- सुशांत काळे, वनक्षेत्रपाल, शिराळा

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com