अध्यादेश जारी..! पहिल्या टप्प्यात शिवभोजनासाठी 1800 थाळींचे नियोजन

अध्यादेश जारी..! पहिल्या टप्प्यात शिवभोजनासाठी 1800 थाळींचे नियोजन


सोलापूर : महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार पहिल्या टप्यात शिवभोजन योजनेंतर्गत रोज 1800 थाळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियु्क्त करण्यात आली असून, महापालिकेचे आयु्क्त समितीचे सदस्य, तर जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव असतील. या संदर्भातील आदेश शासनाने बुधवारी जारी केले. 

तीन महिन्यांसाठी असेल योजना
प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या तीन महिन्यांसाठी ही योजना असेल. त्याला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी किमान एक भोजनालय सुरु करण्यात येईल. दहा रुपयांत उपलब्ध होणाऱ्या या भोजनामध्ये दोन चपात्या, वरण, भाताचा समावेश असेल. 

या ठिकाणी चालविता येईल भोजनालय
सध्या सुस्थितीत सुरु असलेली खानावळ, महिला बचत गट, स्वयंसेवी संस्था, भोजनालय, रेस्टारंट अथवा मेस यापैकी योजना सक्षमपणे राबविणाऱ्या संस्थेची समितीमार्फत निवड केली जाणार आहे. गरीब आणि मजूर वर्गाची वर्दळ असलेल्या ठिकाणी, तसेच जिल्हा रुग्णालये, बसस्थानके, बाजारपेठा, शासकीय कार्यालय परिसरात या थाळीची विक्री होईल याची जबाबदारी समितीमार्फत घेतली जाणार आहे. 

शहर व ग्रामीणसाठी वेग-वेगळे दर
ही योजना महाराष्ट्रातील शहर व ग्रामीण भागात राबविली जाणार असून, शहरी भागात 50 रुपये तर ग्रामीण भागात 35 रुपये थाळीचा दर असेल. समितीने नियुक्त केलेली संस्था ग्राहकांकडून फक्त 10 रुपये घेईल. उर्वरीत रक्कम त्यांना अनुदानाच्या स्वरुपात दिले जाणार आहे. हे भोजनालय दुपारी 12 ते 02 या कालावधीत सुरु राहील. शासकीय कार्यालयाच्या परिसरात असलेल्या भोजनालयात सवलतीचे भोजन घेण्यास शासकीय कर्मचाऱ्यांना बंदी असणार आहे.

जिल्ह्यानिहाय थाळ्यांची संख्या 
रायगड-अलिबाग (400), रत्नागिरी 300), सिंधुदुर्ग (150), नाशिक (1000), धुळे, नंदुरबार (प्रत्येकी 300), जळगाव, नगर (प्रत्येकी 700), पुणे (1500), सातारा (500), सांगली (450), सोलापूर (700), कोल्हापूर (600), अौरंगाबाद (500), जालना व परभणी (प्रत्येकी 300), हिंगोली (200), बीड (400), नांदेड (400), उस्मानाबाद (250), लातूर व बुलडाणा (प्रत्येकी 400), अकोला व वाशिम (प्रत्येकी 300), अमरावती (500), यवतमाळ (450), वर्धा (200), नागपूर (750), भंडारा व गोंदिया (प्रत्येकी 200), चंद्रपूर (350), गडचिरोली (150), मुंबई शहर (450), मुंबई उपनगर (1500), ठाणे (1350) व पालघर (450). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com