नगर ः हनिमून हा प्रत्येकाच्या आयुष्यातील नाजूक क्षण. प्रत्येक माणसाच्या आयुष्यभर लक्षात राहणारी ती गोड आठवण. शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही हा शब्द प्रचलित झाला आहे, नव्हे तो अंगवळणीही पडलाय. पूर्वी चित्रपटात किंवा टीव्हीवरील मालिकेत दाखवले जाणारे ते मधुचंद्राचे प्रसंग आपल्यासाठी नाहीतच, अशीच धारणा ग्रामीण भागात किंवा मध्यम वर्गीयांत असायची. आता लग्नापूर्वीच हनिमून टूर किंवा एखाद्या चांगल्या हॉटेलातील सूट बुक केलेला असतो. मित्र मंडळी किंवा नातेवाईकांकडून तशी तजवीज केली जाते. आता तर काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना हनिमून टूरची तिकिटे उपलब्ध करून देतात.
ट्रॅव्हल्स कंपन्यांनी वेगवेगळी हनीमून पॅकेजेस तयार केलीत. वरकरणी हा थिल्लरपणा वाटत असला तरी ती गरज आहे. हनिमून ही आताच्या फास्ट जमान्यातील गरज बनली आहे. पूर्वीच्या काळी लग्नातील सर्व संस्कार पूर्ण केल्याशिवाय नवदाम्पत्याला जवळ येऊ दिले जात नव्हते. त्यामागेही एक संस्कार होता. परंतु आता तो काळही राहिला नाही आणि ती पिढीही उरलेली नाही. त्यामुळे या गोष्टींसाठी हनिमूनला गेलंच पाहिजे.
हनीमूनवर जाणं म्हणजे फक्त मिलन नव्हे.याच काळात नवदाम्पत्य एकमेकांना जास्त समजून घेत असतात. हनिमूनच्या काळात एकत्र आलेले दोघे शरीरासोबतच मनानेही जवळ येत असतात. त्यामुळेच हनिमून गरजेचा आहे. याच काळात ते दोघे एकमेकांवर विश्वास ठेवायला लागतात. आणि हा विश्वास भावी आयुष्यात खूपच महत्त्वाचा असतो.
या गोष्टींची होईल अनुभूती
१) लग्नानंतर आनंदाची परमोच्च बिंदू कुठला असले तर मधुचंद्र. मनाने जवळ येण्यासाठी हा काळ महत्त्वाचा असतो.
२) हल्ली प्रत्येकाच्याच मागे कामाचा व्याप आहे. त्यामुळे भावी आयुष्यात जोडीदाराला वेळ फारसा देता येत नाही. त्यामुळे लग्नानंतर लगेच हनिमूनला गेलं तर जवळीक आणखी घनिष्ट होते. दोघांनाही ऎकमेकांना समजून घ्यायला वेळ मिळतो.
३) तुम्हा दोघांनाही तुमच्या आवडीनिवडी, विचार जाणून घेता येतात. कारण याच काळात फक्त दोघेच एकमेकांचा विचार करीत असतात.
४) लग्नानंतर नव्या जीवनाच्या सुरवातीलाच असे बाहेर कुठे गेलात तर त्या आठवणी जीवनभर तुमच्या स्मरणात राहतील.
५) लग्न समारंभातील दगदगीनंतर हनीमूनमुळे तुम्ही एकदम फ्रेश होऊ शकता.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.