शिवरायांनी १६७६ मध्ये हा किल्ला बांधला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६९३ मध्ये तो मोघलांकडे गेल्याचा इतिहास ज्ञात आहे.
किल्लेमच्छिंद्रगड : जिल्ह्यातील मच्छिंद्रगडावरील (Machindragad) मच्छिंद्रनाथ मंदिरासमोरील चिंचेच्या पारकट्ट्यातील शिलालेखाबाबत नवी माहिती समोर आली आहे.
इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे, अतुल मुळीक यांनी दिलेल्या माहितीनुसार हा शिलालेख छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) काळातील असून तेव्हाचे किल्लेदार व त्यांची पत्नी यांच्याविषयीचे काही संदर्भ त्याच्या वाचनातून स्पष्ट होतात. हा शिलालेख मध्यभागातून उभा चिरलेला पाच ओळींचा असून या ओळी देवनागरी लिपीतील आहेत, ज्यातून तत्कालीन प्रथा-परंपरांचीही माहिती समजते.
अभ्यासकांच्या मते, सध्या जिथे शिलालेख आहे, ती जागा मूळची नसावी. तो किल्ल्यावर अन्यत्र बसवला गेलेला असावा. काळाच्या ओघात तो पारकट्ट्यावर बसवला गेलेला असावा. बांधणारी व्यक्ती एक स्त्री असावी, शिलालेखात तो शब्द दोन अक्षरी आहे. त्या ठिकाणी नात किंवा सून असा यापैकी एक (स्त्रीलिंगी) शब्द असावा, असे वाटते. जिने की तीर्थस्वरूपेप्रमाणे हा सवासा (स्मारक) बांधले आहे.
शिलालेखातील तारखेचे उल्लेख अभ्यासता, त्या तिथीस १३ फेब्रुवारी, १६८४, बुधवार अशी इंग्रजी तारीख येते. लालाई आऊ ज्या की, किल्ल्याचे हवालदार (किल्लेदार) यांच्या पत्नी होत्या. बहुतेक या पती-पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांची समाधी ही या तारखेस पूर्ण झाली. या तिथीचा कालखंड छत्रपती संभाजी महाराजांचा आहे.
किल्ल्याचे हवालदार बावाजी पवार असल्याचे स्पष्ट होते. शिलालेखात काही भाग खंडित झाल्याने लालाई यांच्या समाधीचे बांधकाम किल्लेदारांच्या कोणत्या नात्यातील व्यक्तीने केले, हे समजत नाही. ‘सवासा केला’ याचा अर्थ सपत्नीक समाधी स्मारक बांधले, असा होतो.
गुडदे, मुळीक म्हणाले, ‘‘प्रत्येक किल्ल्यावर एक इमानी, शूर व चाणाक्ष असा मराठा हवालदार (किल्लेदार) असे. त्याच्यावर किल्ल्याच्या बंदोबस्ताची व संरक्षणाची जबाबदारी असे. किल्ल्याच्या दरवाजाच्या किल्ल्या त्याच्याकडे असत. किल्ल्याचे दरवाजे उघडणे व बंद करणे, याकडे त्याला जातीने लक्ष द्यावे लागे. हवालदार हा किल्ल्यातील सैन्याचा प्रमुख असे.
शिवरायांनी १६७६ मध्ये हा किल्ला बांधला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६९३ मध्ये तो मोघलांकडे गेल्याचा इतिहास ज्ञात आहे. दरम्यानच्या काळात तो स्वराज्यात होता. या शिलालेखामुळे किल्ल्याच्या इतिहासावर नव्याने प्रकाश पडला आहे. इतिहास अभ्यासक प्रवीण भोसले, मच्छिंद्रगडचे गोरख पुजारी, विजय सरडे, नीलेश शेळके यांचे नवसंशोधनासाठी सहकार्य मिळाले.’’
१. स्वस्ति श्री शके १६०५ वर्षे रू (धिरो)
२. द्री फाळगुण शुध ८ बुध (वा)
३. सरे पुर्ण किळ लालाई आऊ बावाजी पावार हावालदार यांची
५. .... तीर्थस्वरुपे केळा सवासा
शिलालेखाचा अर्थ : शालिवाहन शके १६०५ या वर्षी रूधिरोद्गारी संवत्सरात फाल्गुन शुद्ध अष्टमी, बुधवार या तिथीस हे बांधकाम पूर्ण केले. लालाई आऊ पती बावाजी पावार हवालदार यांची (नात किंवा सून) स्वकीय यांनी तीर्थस्वरूप प्रमाणे (जन्मदाते आई-वडिलांप्रमाणे) सवासा केला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.