दोघा भावांनी गुण्यागोविंदानं नांदावं

दोघा भावांनी गुण्यागोविंदानं नांदावं
Updated on

रांजणी (कवठेमहांकाळ) - ‘‘भारत आणि पाकिस्तान ही एकाच घरातली भावंडं... काही कारणानं घर फुटलं आणि दोन भाऊ वेगळे झाले. आता धाकट्या भावानं थोरल्या भावाच्या कुरापती काढणं थांबवावं आणि दोघांनीही गुण्यागोविंदानं नांदावं,’’ अशा भावना सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या वीरमाता व्यक्त करत आहेत.

या वीरमाता आहेत भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातल्या सैनिकांच्या गावच्या. कोल्हापुरातील सैनिक टाकळी आणि रांजणी या गावांतील माजी सैनिक आणि वीरमातांनी सध्याच्या भारत-पाक युद्धस्थितीबाबत आपली मनं ‘सकाळ’जवळ मोकळी केली. सैनिक टाकळी हे कृष्णाकाठचं सुपीक आणि समृद्ध गाव. नोकरी शोधण्यासाठी म्हणून नव्हे, तर वाडवडिलांची परंपरा पुढे चालविण्यासाठी सैनिक टाकळीतील सुमारे ५०० युवक आज भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत.

पहिल्या महायुद्धापासून ते कारगिल युद्धापर्यंत गावातील १८ जवान देशाचे रक्षण करताना हुतात्मा झाले आहेत. गावात ६०० हून अधिक माजी सैनिक राहतात. त्यांचेही बाहू फुरफुरत आहेत. गावातील माजी सैनिकांची संघटना बांधणारे निवृत्त ऑनररी लेफ्टनंट बी. एस. पाटील म्हणाले, ‘‘गेल्या काही दिवसांतल्या पाकच्या कुरापती पाहता त्यांची खोड कायमची मोडली पाहिजे असे वाटते; पण युद्ध कोणालाही परवडणार नाही. ते देशाच्या विकासाला खीळ घालणारे आहे.’’ 

येथील माजी सैनिकांनी मिळून ग्रामपंचायतीची निवडणूक लढविली आणि सुप्रिया विनोद पाटील या महिलेची सरपंचपदी निवड केली. आता त्यांच्या माध्यमातून गावातील हुतात्मा स्मृतिस्थळ आणि गावच्या विकासाचे काम प्रगतिपथावर आहे.
सैनिक टाकळी या हिरव्यागार गाव परिसराच्या बरोबर विरुद्ध टोक म्हणजे, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यातील रांजणी गाव.

येथे सर्वत्र उजाड माळरान, उन्हाची रखरख आणि पाणीटंचाई. या अभावग्रस्त परिसरातल्या रांजणी गावातले मनगट आणि मन बळकट असणारे तब्बल दीड हजार सैनिक देशाच्या सीमांचे रक्षण करत आहेत. गावात ९५० माजी सैनिक राहतात. म्हणून या गावाला म्हणतात, सैनिक रांजणी. वेगवेगळ्या युद्धांत या गावातले १३ जवान हुतात्मा झाले आहेत. तरुण जवानांना घडविणाऱ्या अनेक जिजाऊ येथील घराघरांत आहेत.

त्यापैकी वैशाली गोविंद भोसले म्हणाल्या, ‘‘आजच सकाळी पुतण्याचा फोन आला होता. म्हणाला, पाकिस्तानात पकडल्या गेलेल्या हवाई दलातील अधिकाऱ्यासोबतच मी काम करतो. तुम्ही चिंता करू नका. माझा मित्र नक्की परत येईल. युद्धाने कुणाचं भलं होणार आहे? भारत-पाकिस्तान या दोन भावांनी गुण्यागोविंदाने नांदणं गरजेचं आहे.’’ कांचनमाला अशोक भोसले यांचे दोन दीर आणि पुतण्या सैन्यात आहे. आपल्या गावच्या आणि देशाच्या सैनिकांनी रण जिंकावे, त्याचबरोबर देशात शांतताही नांदावी, अशा भावना माजी सैनिक आणि त्यांना घडविणाऱ्या वीरमाता व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sahyadri tiger kingdom power struggle
Social Reforms: MAnis Announces State-Level Awards for Dedicated Rationalist Activists
six people killed in Maharashtra Karnataka border land dispute vijapur chadchan crime
Crime
Marathi News Esakal
www.esakal.com