सोलापूर - आयटीआयच्या प्रवेशावेळी एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे बंधनकारक नाही. मात्र, एक महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखल सादर करणार असल्याचे पालकांचे हमीपत्र देणे बंधनकारक असल्याची माहिती शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण गायकवाड यांनी दिली.
मराठा आरक्षणानंतर आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसह पालकांनी एसईबीसीचे जात प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज केले आहेत. मात्र, अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळालेले नाही. दरम्यान, आयटीआयसह अन्य अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, अशा विद्यार्थ्यांकडून एसईबीसीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार आयटीआयसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र नसेल, तरीही प्रवेश द्यावा. मात्र, त्यांच्या पालकांचे हमीपत्र घेणे बंधनकारक असेल, असे स्पष्ट केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
|