
तासगावातील ५५० लोकसंख्येचा भाग ; रहिवासी भागाचा नकाशा तयार
तासगाव (सांगली) : तासगाव शहरातील खाडेवाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रहिवासी भागाचा नकाशा तयार होऊन स्वातंत्र्यानंतर तब्बल ७३ वर्षांनी आमदार सुमनताई पाटील यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात या भागाचे शिवाजीनगर असे नामकरण करण्यात आले. सुमारे ५५० लोकसंख्येचा हा भाग कागदावर नव्हताच !
तासगाव शहराच्या हद्दीत असलेला भाग. शहरापासून दोन किमी अंतरावर असलेली ११० घरे. सुमारे ५५० लोकसंख्या. प्रचलित नाव खाडेवाडी. तासगाव पालिकेच्या रेकॉर्डवर तसेच होते. मात्र त्याचा नकाशा नव्हता. आतापर्यंत सगळी कामे व्हायची ती तशीच. याभागात राहणारे मतदार होते. पालिकेकडून घरपट्टी आकारली जात असे. पण सोयी देताना अडचणी येत.
हेही वाचा- कोरोना संकटात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाचा हात -
या भागात खासदार संजय पाटील, दिवंगत आर. आर. पाटील यांच्या माध्यमातून कोट्यवधींची कामे झाली. कागदोपत्री अडचणी कायम होत्या. सन २०१२ मध्ये या भागातील राहुल शिंदे यांनी आर. आर. आबांकडे पाठपुरावा केला. त्यातून तत्कालीन जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी या भागाचा नकाशा तयार करणे आणि सिटी सर्व्हे करण्याची प्रकिया सुरू केली. सन २०१६ मध्ये हे प्रकरण लोकायुक्तांकडे गेले. लोकायुक्तांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना आदेश दिल्यानंतर त्यानुसार या भागाचा नकाशा तयार करण्यात आला. त्यानुसार अडीच हेक्टर क्षेत्र गावाचा भाग म्हणून नकाशावर आले आहे. यथावकाश सिटी सर्व्हे होईल. पालिकेने ठराव करून या भागाचे नामकरण शिवाजीनगर असे करण्यात आले.
एखाद्या कामाचा कायदेशीर पाठपुरावा केला, की सरकारी यंत्रणेला दखल घ्यावीच लागते. त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. राहुल शिंदे या युवकाच्या धडपडीला यश आले.
आमदार सुमनताई पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. गजानन खुजट, पालिकेचे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात या भागाच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
संपादन- अर्चना बनगे