सरकारकडून लोकांच्या अपेक्षा अजूनही आहेत - पूनम महाजन

सरकारकडून लोकांच्या अपेक्षा अजूनही आहेत - पूनम महाजन
Updated on

कोल्हापूर - राज्य व केंद्र सरकारच्या कामाबद्दल लोकांतून नकारात्मक प्रतिक्रिया नसल्या तरी अजूनही सरकारकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, असे भाजप युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

केंद्रीय मंत्रीमंडळात फार चांगले "टीम वर्क' आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी या टीमचे कर्णधार म्हणून धुवॉंधार खेळत आहेत, त्यांच्यामुळे काम करण्याची पध्दतही बदलली, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

मी आणि मुख्यमंत्री...जरा थांबा 
राज्यात महिला मुख्यमंत्री असावा का ? तुम्हाला व्हायला आवडेल का ? या प्रश्‍नावर त्या म्हणाल्या,"मुख्यमंत्री हा लोकांच्या मनातील हवा. महिला व पुरूष यांच्यात या पदासाठी तेवढी क्षमता आहे. भाजप हा कामाला महत्त्व देणारा पक्ष आहे, जनतेचा मुख्यमंत्री असावा असा पक्षाचा प्रयत्न आहे, त्यात देवेंद्र फडणवीस हे योग्य आहेत. मला 2019 ची लोकसभा महत्त्वाची असून ती जिंकून दाखवायची आहे.' 

खासदार विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने व युवा मोर्चाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आजपासून पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना राज्यासह देशातील विविध प्रश्‍नाला हात घातला. 

त्या म्हणाल्या, "नोटबंदी, जीएसटी आदि निर्णयाने केंद्र सरकार "बॅकफुट' वर गेल्याचे मी केलेल्या दौऱ्यातील संवादात कोठे दिसले नाही. वाचनातून काही गोष्टी समोर आल्या, प्रत्यक्ष संवाद साधताना लोकांच्या अजूनही सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. लोकांकडून "फिडबॅक' चांगला येतो. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहीजेत, हे काम युवा मोर्चाकडून सुरू आहे. युवकांची जी स्वप्ने आहेत तीच देशाची आहेत, त्यामुळे युवकांत उत्साह पहायला मिळाला.' 

भाजप-सेना युती दोन्हीकडून तोडली गेलेली नाही, घरात खटके उडत असतात, जास्त दिवस दोन्ही पक्ष एकत्र असल्याने असे खटके अपेक्षित आहेत, पण ते घटस्फोटापर्यंत पोहचले असले तरी पक्ष वाढत असताना हे होत रहाणार. दोघेही सरकारमध्ये आहेत,त्यांनी जबाबदारीने वागायला पाहीजे, युती करण्याबाबत संवाद सुरू आहे, अजून निवडणुकीला भरपूर वेळ आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींवर माझा पूर्ण विश्‍वास असल्याचे सांगत खासदार महाजन यांनी भाजप-सेना युती पुन्हा होईल असा आशावाद व्यक्त केला. 

केरळ, तामिळनाडू, पश्‍चिम बंगालमध्ये कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असल्याचा आरोप करून महाजन म्हणाल्या, "केरळमध्ये युवा मोर्चाच्या अध्यक्षाचे डोके फोडले. जम्मू-काश्‍मिरमध्ये युवा मोर्चाचा कधीच मेळावा झाला नव्हता, त्याठिकाणी तो मी घेतला, पण त्यानंतर तिथल्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षाचा खून झाला. अशा सर्व राज्यात संबंधितांविरोधात गुन्हाही दाखल करून घेतला जात नाही, ही बाब गंभीर आहे. याबाबत आपण केंद्र सरकारकडे तक्रार केली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करून तो इतर राज्यातील जलदकृती न्यायालयात चालवण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.' त्या राज्यात भाजप सरकार नाही म्हणून मी ही टीका करत नाही तर त्या राज्यातील कॉंग्रेससह इतर पक्षांनाही विचारा त्यांच्याकडूनही याच तक्रारी येतील, अशी पुष्टीही महाजन यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना जोडली. 

नीरव मोदी प्रकरणात सरकारवर टीका होते, तुमचाही फोटो नीरव मोदीसोबत आहे, यावर बोलताना महाजन म्हणाल्या,"फोटोत डाव्या व उजव्या बाजूला कोण हे मी पाहीले नाही. तुम्ही एकाच बाजूच्या फोटावरून हा प्रश्‍न विचारता, दुसऱ्या बाजूला प्रिन्स होते त्यांच्याबाबतही विचारत नाही. पंजाब नॅशनल बॅंकेतील गैरव्यवहाराबाबत रविशंकर प्रसाद यांनी केलेला खुलासा आपण पुढे घेऊन जावे.' 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडीक, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, देवस्थानचे अध्यक्ष महेश जाधव, "गोकुळ' संचालक बाबा देसाई, युवा मोर्चाचे राज्याध्यक्ष आमदार योगेश टिळेकर, मधुकेशव देसाई, अमित कुमार, जिल्हाध्यक्ष अमरसिंह भोसले उपस्थित होते. 

मतदान प्रेमाने सक्तीचे करावे 
लोकसभेसोबत महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा प्रयत्न सुरू असला तरी ती फक्त चर्चा सुरू आहे, त्यात मी सहभागी नाही. मतदान सक्तीचे करावे पण ते प्रेमाने, प्रेमाने वर होणारा हात, मतदान करताना तो तुम्हालाच मतदान केले असे सांगू शकणार नाही. मतदार संख्या वाढवण्यासाठी नव मतदारांची नोंदणी होणे आवश्‍यक आहे, त्यासाठी महाविद्यालयात प्रवेश घेतानाच मतदार नोंदणीचे फॉर्म भरून घेतले पाहीजेत, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 

सोशल मिडीयाचा सकारात्मक वापर 
सोशल मिडीयाचा सर्वाधिक वापर भाजपने केला हे मान्य असल्याचे सांगून महाजन म्हणाल्या,"या माध्यमाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून बघितले पाहीजे. एखाद्या फोटावर किती प्रतिक्रिया पडाव्यात याला मर्यादा नाहीत. म्हणून युवकांनीच या माध्यमाचा वापर सकारात्मक करावा.' 

खासदारांचे मानधन आणि मी 
खासदारांचे वेतन, भत्ते किती असावेत हे खासदारांनीच ठरवावे याला माझा आक्षेप आहे. त्यासंदर्भातील खासदारांच्या प्रतिक्रियावर मी सही केलेली नाही. पण खासदारांचे मानधन, भत्ते ठरवण्यासाठी स्वतंत्र समिती असावी, ही समितीच सरकारला याबाबत सुचवेल, त्यावर निर्णय व्हावा, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. 
............... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sakshi Pawar death after Renavi Ghat accident
Chandrakant Patil Announces Gazette Notification for Jat Taluka
Shirala Nag Panchami 2026
Sangli Miraj Urban Expansion and Drainage Crisis
Marathi News Esakal
www.esakal.com