
कोल्हापूर : वटवृक्षास मिळावे कायदेशीर संरक्षण
कोल्हापूर : वटवृक्षाची सावली मनाला प्रसन्नता देते. ऑक्सिजनपुरवठ्याचा जणू खजिनाच असलेल्या बहुगुणी वटवृक्षाची लागवड आरोग्यहिताची, पर्यावरण संतुलनास बळ देणारी आहे. वट पौर्णिमेला पूजनाबरोबर राष्ट्रीय वृक्ष म्हणून कायदेशीर संरक्षण मिळावे, तसेच वटवृक्षाची लागवड वाढीस लागावी यासाठी प्रयत्न होण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची गरज आहे, असा सूर ‘सकाळ’मध्ये घेण्यात आलेल्या वटपौर्णिमेला ‘चला, वड लावूया’ या विषयावरील सिटिझन एडिटरमध्ये व्यक्त झाला.
निसर्गसंवर्धनाचे एक पाऊल टाकूया...
वडाची पूजा करण्याच्या व्रतातून पत्नी पतीसाठी काहीतरी त्याग करते, यातून पतीला पत्नीविषयी आपुलकी, स्नेह वाढू शकतो. अशा आपुलकीच्या नात्याचे प्रतीक म्हणून वट सावित्री सणानिमित्त निसर्ग संवर्धनाचे एक पाऊल पुढे टाकले जावे, अशा अपेक्षेतून वट सावित्रीपूजन हा सण सुरू झाला असावा. तसेच निसर्ग संर्वधनासाठी रोज वडाचे झाडे लावा किंवा त्याची जोपासना करा, असे सहज कोणी सांगितले तर कोणीही ऐकेल याची खात्री नाही. म्हणून त्याला पौराणिक कथांची जोड देऊन त्या आधाराने निसर्गाशी आदर भाव व्यक्त करण्याचा उद्देश ठेवला गेला. त्यामुळे वट सावित्रीला वटवृक्षपूजन सुरू झाले. वर्षानुवर्षे सुरू झालेल्या प्रथेतून वडाच्या झाडांचे संगोपन होते, ही बाब निसर्ग संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.
- संगीता कोकितकर, वसुंधरा क्लब
पती-पत्नीच्या आपुलकीच्या नात्याचे प्रतीक
निसर्गाशी आदरभाव व्यक्त करण्याचा उद्देश सावली, ऑक्सिजनसह
वड जगण्याचे बळ देतो
वड हे झाड राष्ट्रीय वृक्ष म्हणून गणले जाते. त्याला कायद्याचे संरक्षण नाही. गार्डन क्लबही त्यासाठी पाठपुरावा करीत आहे. वडाचे झाड आधारवड किंवा तो विस्तार वृक्ष आहे. वडाच्या झाडातून मिळणारा ऑॅक्सिजन मानवासोबत पशुपक्ष्यांना जगण्याचे बळ देतो. वडाची झाडे ५०० ते ६०० वर्षे जगू शकतात. वडाच्या काड्या यज्ञासाठी वापरल्या जातात. आयुर्वेदीय औषधी गुणधर्म अनेक आहेत. अशी वडाची उपयुक्तता मोठी आहे. त्यामुळे वडाच्या झाडाला संरक्षणाची गरज आहे. त्याच्या संवर्धनाचा भाग म्हणून पारंब्यापासून तयार होणारे नवीन वटवृक्षांची लागवड व्हावी, त्याची जोपासना व्हावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी वट सावित्रीचा सण साजरा करताना लावलेली वडाची झाडे किंवा मूळतः वाढलेली वडाची झाडे अधिक चांगल्या प्रकारे जगविली पाहिजेत.
- कल्पना सावंत, अध्यक्षा, गार्डन्स क्लब
वडाचे झाड आधारवड तसेच विस्तार वृक्ष
आयुर्वेदीय औषधी गुणधर्म, उपयुक्तता मोठी
वटवृक्ष संवर्धन उपक्रमास
महापालिकेचे सहकार्य
निसर्गमित्र संस्थेतर्फे आम्ही गेली २२ वर्षे वटवृक्ष पेढी चालवतो. ज्यामध्ये दरवर्षी वडाची रोपे दत्तक देतो. ही झाडे जरा मोठी झाली की ती मोकळ्या जागेत, उद्यानात लावतो. महापालिकेने या उपक्रमास सहकार्य केले आहे. वडात खूप औषधी गुणधर्म आहेत. त्यापैकीच एक म्हणजे महिला जेव्हा वडाची पूजा करण्यास जातात. तेव्हा त्यांच्या अंगावर वडातील तुषार पडतात. ज्यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या जलजन्य आजारांपासून संरक्षण मिळते, वडाच्या मुळांपासून तेल मिळते. ज्या तेलाचा उपयोग केस संवर्धनासाठी होतो. वटपौर्णिमेचा दिवस महाराष्ट्र वृक्ष दिन म्हणूनही साजरा केला जातो. ज्यामध्ये शासनातर्फे वटवृक्षाचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यात लोकांनी सहभागी होऊन वटवृक्ष संवर्धन करण्यासाठी हातभार लावण्याची गरज आहे.
- राणिता चौगुले, निसर्गमित्र संस्था
मुळांपासून मिळणारे तेल केस संवर्धनासाठी उपयुक्त
तुषारांपासून पावसाळ्यातील जलजन्य आजारांपासून संरक्षण
वटवृक्षाची लागवड करून
त्याची जोपासना करूया
भारतीय सणामध्ये निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी प्रतीके आहेत. निसर्गातील अनेक गोष्टींचे पूजन त्यानिमित्ताने होते, मात्र काही वेळा झाडांची कमतरता असताना झाडांच्या फांद्या, पाने, फुले, फळे अतिरिक्त प्रमाणात तोडून निसर्गाला हानी पोहोचवली जाते, असेही दिसते. वट सावित्रीच्या सणालाही अनेकदा वटवृक्ष सहज उपलब्ध झाले नाहीत. या कारणाने फांद्या तोडून त्यांचे पूजन केले जाते. ही बाब चुकीची आहे. त्यापेक्षा वटवृक्षाची लागवड करून त्याची जोपासना केली, तर प्रत्येकवर्षी एक नवे झाडे तयार होईल. निसर्ग संवर्धनाला त्यातून खरे बळ मिळेल. त्यासाठी निसर्ग संवर्धनाचे विविध संकल्प अशा सणाच्या वेळी केल्यास पर्यावरण संतुलन राखण्यासाठी, आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी जोड मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- जयश्री कजारिया, वसुंधरा क्लब
भारतीय सणांत निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारी प्रतीके
वटवृक्ष न मिळाल्यास फांद्या तोडून केलेले पूजन चुकीचे
Web Title: कोल्हापूर वटवृक्षास मिळावे कायदेशीर
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..