कोल्हापूर : चित्री मध्यम प्रकल्पातील पाणी संपविण्याचे आव्हान!

चित्री प्रकल्पात तब्बल ९४ टक्के साठा शिल्लक; मेअखेरपर्यंत होणार तीनच आवर्तने
chitri project challenge use water Gadhinglaj kolhapur
chitri project challenge use water Gadhinglaj kolhapursakal

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा तालुक्यांना वरदायी ठरलेल्या चित्री मध्यम प्रकल्पातील पाणी काटकसर करून पुरविण्याचे आव्हान दरवर्षी पाटबंधारे विभागासमोर असते. त्यासाठी हिरण्यकेशी नदीवर उपसाबंदीही लागू केली जाते; मात्र यंदा उलट परिस्थिती आहे. फेब्रुवारी महिना संपत आला तरी प्रकल्पात तब्बल ९४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पाटबंधारे विभागाने यापुढे पाच आवर्तने घेण्याचे नियोजन केले आहे; पण मेअखेरपर्यंत तीनच आवर्तने होणार, हे वास्तव आहे. त्यामुळे चित्रीचे पाणी संपविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

चित्री मध्यम प्रकल्पातून दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यानंतर हिरण्यकेशी नदीत पाणी सोडले जाते. मे महिन्यापर्यंत सर्वसाधारण पाच आवर्तने होतात. पाण्याच्या उपलब्धतेच्या तुलनेत मागणी अधिक असल्याने दरवर्षी हिरण्यकेशी नदीवर उपसाबंदीही लागू केली जाते. तरच मेअखेरपर्यंत पाणी पुरते] मात्र, यंदा परिस्थिती निराळी आहे. परतीचा पाऊस अगदी डिसेंबर महिन्यापर्यंत झाला. त्यामुळे जमिनीत ओल कायम होती. परिणामी, नदीतील पाण्याचा उपसाही थांबला होता. नदी दुथडी भरून राहिल्याने १७ फेब्रुवारीपर्यंत चित्री प्रकल्पातून पाणी सोडण्याची गरजच लागली नाही.

दरम्यान, चित्री प्रकल्पात क्षमतेच्या ९४ टक्के म्हणजे १७९० एमसीएफटी पाणीसाठा आहे. यातील पिण्यासाठी २००, औद्योगिक कारणासाठी १५, बाष्पीभवन १२०, राखीव १७० असा ५०५ एमसीएफटी साठा वगळला तरी १२८५ एमसीएफटी पाणी सिंचनासाठी शिल्लक राहते. पाच आवर्तनात हे पाणी चित्रीतून सोडले जाणार आहे. २१ दिवस पाणी सोडल्यानंतर ७ दिवस बंद असे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे. एका आवर्तनात साधारण २६० ते २८० एमसीएफटी पाणी सोडले जाते. यंदा पहिले आवर्तन १८ फेब्रुवारीला सुरू केले आहे. याचा विचार केला तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत तीनच आवर्तने होणार आहेत. कारण, पुढील पावसाळ्याचा विचार करून दरवर्षी २५ मेपासून हिरण्यकेशी नदीवरील बंधाऱ्यातील बरगे काढण्यास सुरुवात केली जाते.

परिणामी, चित्री प्रकल्पात सुमारे किमान ५०० एमसीएफटी अतिरिक्त पाणी शिल्लक राहण्याची शक्यता आहे. पाऊसमान चांगले राहिले तर या अतिरिक्त पाण्यामुळे पुढील पावसाळ्यात प्रकल्प लवकर भरणार आहे. त्यामुळे पाणी संपविण्याचे आव्हान विभागासमोर आहे.

चित्री प्रकल्पामध्ये यंदा अधिक पाणीसाठा आहे. पुढील पावसाळ्याचा विचार करता २५ मेनंतर बंधाऱ्यातील बरगे काढण्यास सुरुवात केली जाते. मात्र, त्यानंतरही आवर्तने घेतली जाणार आहेत. पावसाचे नवीन पाणी हिरण्यकेशीत येईपर्यंत चित्रीतून पाणी सोडले जाईल.

- ए. बी. कदम, उपअभियंता, पाटबंधारे विभाग, गडहिंग्लज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com