कोरोनाने बदलले रेशन दुकानांसमोरील चित्र, आधी धान्य न्यायला सांगावे लागे; आता द्या, म्हणून लागतेय रांग

कोरोनाने बदलले रेशन दुकानांसमोरील चित्र, आधी धान्य न्यायला सांगावे लागे; आता द्या, म्हणून लागतेय रांग
Updated on

कोल्हापूर : महिन्याची 25 तारीख उलटली तरी रेशनवरचे धान्य नेण्यास अनेक जण उत्सुक नसायचे. ""अहो वहिनी, धान्य न्यायला या,'' असा निरोप धान्य दुकानदार शेजाऱ्यापाजाऱ्यांकडून पाठवायचा. तरीही प्रतिसाद जेमतेमच. पण परिस्थिती कशी बदलते बघा. आता रेशन धान्य दुकानासमोरची रांग कमी होईनाशी झाली आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर माणशी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत दिला जात आहे. म्हणून तर गर्दी आहेच; पण रेशनवरचा आठ रुपये किलोचा गहू व 12 रुपये किलोचा तांदूळही बघता बघता संपू लागला आहे. कोरोनामुळे जगण्याचे संदर्भ कसे बदलत आहेत, याचे हे ताजे उदाहरण आहे. 
यात आणखी भर म्हणून येत्या काही दिवसांत प्रत्येकी एक किलो तूर किंवा हरभरा डाळ मोफत दिली जाणार आहे. आज डाळ आली आहे; पण प्रत्येक धान्य दुकानापर्यंत ती पोचवण्याचे काम चालू आहे. 
कोल्हापुरात साडेपाच लाख शिधापत्रिकाधारक आहेत. त्यात पिवळे शिधापत्रिकाधारक व केशरी पैकी प्राधान्य कुटुंब लाभार्थी आहेत. त्यांना गहू व तांदूळ याचे नियमित वाटप शिधापत्रिकेवर केले जाते. लोक ते धान्य नेतातही; पण अनेक जणांना रेशनवरील धान्य म्हणजे थोडे कमी दर्जाचे वाटते. काही जणांना रेशन दुकानाच्या रांगेत आपण उभा राहणे म्हणजेही स्टेटसला धक्का बसल्यासारखे वाटते. त्यामुळे अनेक जण हे धान्य न्यायला येत नव्हते. त्यामुळे दर महिन्याच्या 20 तारखेनंतर "अहो वहिनी, धान्य न्या,' असे निरोप देण्याचे काम दुकानदाराला करावे लागत होते आणि ग्राहकांच्या बोटाचा ठसा (थंब इंप्रेशन) घेतल्याशिवाय धान्य खर्चही टाकता येत नसल्याने काही ठराविक विक्रेत्यांची अडचणही होत असे. 
कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर मात्र हे सारे संदर्भच बदलले. गहू, तांदूळ कधी येणार, याची लोक सतत चौकशी करतात. या काळात मोफत धान्य मिळत असल्याने रांगेत तर उभा राहतातच; पण जाताना आठ रुपये किलोचा गहू, 12 रुपये किलोचा तांदूळही नेतात. त्यामुळे दुकानासमोर रांगाच आहेत. आज महिन्याची 15 तारीख. तोवर लोकांनी धान्य नेलेही आहे. 


जिल्ह्यात साडेबारा हजार टन तांदूळ व गहू आणि मोफत वाटण्यासाठी तितकाच तांदूळ, गहू लागतो. आता हरभराडाळ व तूरडाळही मोफत मिळेल. डाळ "नाफेड'कडून आली आहे. चांगल्या दर्जाची आहे. आता कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्येकाचे थंब इंप्रेशन नको म्हणून ते थांबवले आहे; पण वाटप सुरू आहे. 
- दत्ता कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी 

धान्य न्या, अशी ज्यांना विनंती करायला लागायची, ते आता धान्य नेण्यासाठी येतात. रांगेत उभा राहतात. शासकीय योजनांचा लाभ घेतात. धान्याचा दर्जा चांगला आहे. जो गहू बाहेर 24 रुपये आहे, तो रेशनवर आठ रुपये व जो तांदूळ बाहेर 30 रुपये आहे, तो रेशनवर 12 रुपये आहे. लोकांनी जरुर ते धान्य नेहमी न्यावे. ते त्यांच्या हक्काचे आहे. 
- रवी मोरे, रेशन धान्य दुकानदार 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Rare bird discovered in Maharashtra forest
Nandwal temple nirmalya recycling project
Rising Tourist Footfall at Rautwadi Waterfall
Design of Kolhapur Cricket Stadium
Marathi News Esakal
www.esakal.com