
कोल्हापूर : काजू, आंब्याला थंडीचा फटका
कोल्हापूर : काही दिवसांपासून पडत असलेल्या थंडीचा फटका काजू व आंबा मोहराला बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रब्बी हंगमातील गहू, हरभरा या पिकांसाठी हे वातावरण पोषक नसले तरी त्यामुळे या पिकांचे फारसे नुकसान होण्याची शक्यता नाही. जिल्ह्यात रब्बी हंगामात बारापैकी पाच तालुक्यांत उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्रात पेरणी झाली आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षीच्या हंगामात ज्वारी पिकाखालील लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. जिल्ह्यातील एकूण पिकाखालील क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र नगण्य असले तरी यावर्षी ११ हजार ७०८ हेक्टर क्षेत्रात ज्वारी लागवडीचे उद्दिष्ट होते, प्रत्यक्षात ११ हजार ७६१ हेक्टर क्षेत्रात ज्वारीची लागवड झाली आहे.
हेही वाचा: कोल्हापूर : बेशिस्त पार्किंगमुळे वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर
सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात रब्बीचा हंगाम सुरू होतो. आता ही पिके काढणीसाठी आली आहेत. ज्वारीबरोबरच हरभरा, गहू, मका, तृणधान्ये, कडधान्ये यांची रब्बी हंगामात लागवड केली जाते. जिल्ह्यातील राधानगरी, गगनबावडा, करवीर व चंदगड तालुक्यात उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्र पिकाखाली आले आहे. राधानगरी तालुक्यात गहू, मका लागवड नाही तर गगनबावडा तालुक्यात या दोन पिकांव्यतिरिक्त ज्वारीचीही लागवड नाही. हातकणंगले, शिरोळ, करवीर, कागल व गडहिंग्ल तालुक्यांत ज्वारीची लागण सर्वाधिक आहे.
हेही वाचा: पालीत वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर, पर्यायी मार्गाला मुहूर्त सापडेना!
जिल्ह्यात उसाखाली १ लाख ८० हजार ९९१ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी लागण ६२ हजार १४९, तर खोडवा ४० हजार ५८६ हेक्टर क्षेत्र आहे. या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात आडसाली, पूर्वहंगाम व सुरू क्षेत्राचा समावेश आहे. शिरोळ तालुक्यात सर्वाधिक २५ हजार १९१ हेक्टर क्षेत्र उसाखाली आहे. भुदरगड तालुक्यात सर्वात कमी चार हजार ९१३ हेक्टर उसाखाली आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, शाहूवाडीचा काही भाग याठिकाणी आंबा व काजूची मोठ्या प्रमाणात लागवड होते. या तालुक्यातच थंडीचा कहर असून, त्याचा फटका मोहरावर झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास हा मोहर वाया जाण्याची शक्यता आहे.
पीकनिहाय लागवडीखाली क्षेत्र हेक्टरमध्ये
पिकांचे नांव उद्दिष्ट प्रत्यक्ष लागण
ज्वारी ११,७०८ ११,७६१
गहू १७४६ १५०१
मका २७९३ १६३६
तृणधान्ये २८० २३०
हरभरा ४६२८ ४३०७
ई कडधान्ये ८३८ ८५६
ऊस १,८०,९९१ १,२३,१९०
हेही वाचा: कोल्हापूर जिल्हा परीषद परिसरात पार्किंगचा प्रश्न गंभीर
'गहू व हरभरा पिकांसाठी हे वातावरण पोषक नसले तरी पिकांची वाढ झाल्याने त्याचा फारसा फटका बसणार नाही. आंबा व काजूची चांगली लागवड आहे. थंडीमुळे मोहरावर परिणाम होऊन काही ठिकाणी गळून पडण्याचा धोका आहे. रब्बीतील इतर पिके काढणीच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात ज्वारी लागवडीखालील क्षेत्र वाढले असले तरी एकूण पिकाखालील क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.
- ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
Web Title: Effect On Weather Cashew Nuts Mangoes Imn Kokan And Kolhapur Rabbi Crops
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..