अनवट राग कोल्हापूरात घेऊन आलेल्या अल्लादियॉं खॉंसाहेबांची पाचवी पिढीही संगीत सेवेत

The fifth generation of Alladiyon Khonsaheb who brought Anavat Raag to Kolhapur is also in the music service
The fifth generation of Alladiyon Khonsaheb who brought Anavat Raag to Kolhapur is also in the music service

कोल्हापूर :  घरोघरी बाप्पांचे आगमन झाले असून, उद्या (मंगळवारी) गौराई आणि बुधवारी (ता. 26) शंकरोबांचे आगमन होईल; पण  राजर्षी शाहूंच्या आमंत्रणावरून सव्वाशे वर्षांपूर्वी उत्तर हिंदुस्थानातील एक कलाकार करवीर संस्थानात आला आणि त्यांनी येथील शास्त्रीय संगीताची परंपरा समृद्ध केली. जयपूर अत्रोली घराण्याचे किंबहुना संगीतातील "गौरीशंकर' असा लौकिक त्यांनी मिळवला. त्यांची पाचवी पिढी आजही संगीत सेवेत असून, खॉंसाहेबांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी आजही केवळ कोल्हापुरातच नव्हे, तर देशभरात विविध ठिकाणी मैफलींचे आयोजन केले जाते. 
खॉंसाहेबांचा जन्म राजस्थानातील ऊनियारा (जि. टोंक) या गावातील. चुलते चिम्मन खॉंसाहेब यांच्याकडून ते गाणे शिकले. त्यांचं जयपूर अत्रोली घराणे म्हणजे अनवट रागांसाठी प्रसिद्ध. पुढे बडोदा संस्थानांसह देशभरात त्यांच्या मैफली रंगू लागल्या. मुंबईतील एका मुक्कामी त्यांची मैफल सजली असताना बापूसाहेब महाराज (कागलकर) यांची त्यांच्याशी भेट झाली आणि त्यांनी कोल्हापुरात परतल्यानंतर राजर्षी शाहूंना त्याची माहिती दिली. राजर्षी शाहूंनी लगेचच त्यांना करवीर संस्थानात आमंत्रण दिले आणि 1895 ला ते येथे आले. अनेक मैफलींबरोबरच त्यांनी मोठी शिष्यपरंपराही निर्माण केली. त्यांचेच शिष्य उस्ताद भुर्जी खॉंसाहेबांनी अंबाबाई मंदिरातील गरूड मंडपात गायनसेवेचा प्रारंभ केला. त्यांचे नातू अजिजुद्दीन खॉंसाहेबांनीही म्हणजे बाबांनी घराण्याची परंपरा पुढे नेटाने सुरू ठेवली. राजमहालापासून ते मंदिराच्या ओवरीपर्यंत त्यांच्या सुरांचा तरंग उमटत राहिला. त्यांचा रियाज असा की, विविध सुरांना तो अलगद बंदिस्त करायचा. हार्मोनियमवर बसून ते एखादा सूर शीळ घालत शिष्यांना समजून सांगायचे आणि त्याची उजळणी शिष्यांकडून करून घ्यायचे. त्यावेळी तो शिष्य जिथे चुकेल तिथे त्याला पुन्हा समजावून सांगायचे आणि पुन्हा सुरू व्हायची शीळ आणि सुरांची जुगलबंदी. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे शिष्य घडले, त्यांतील बहुतांश शिष्यांना त्यांनी याच पद्धतीने शास्त्रशुद्ध शिक्षण दिले. त्यांनीही अखेरच्या श्‍वासापर्यंत संगीताची सेवा केली. अल्लादियॉं खॉंसाहेबांचे सूर "बंगडी' या ध्वनिमुद्रण प्रकारात बंदिस्त असल्याची त्यांची खात्री होती. त्यासाठीही त्यांचे अखेरपर्यंत प्रयत्न राहिले. त्यांच्या खरी कॉर्नर येथील निवासस्थानी तर देशभरातून कलाकार, संगीतप्रेमी यायचे. अगदी "बालगंधर्व' चित्रपटाची संकल्पना जेव्हा पुढे आली तेव्हा नितीन देसाई यांच्यासह त्यांच्या टीमने बाबांचेच मार्गदर्शन घेतले होते. 


अल्लादियॉं खॉंसाहेबांचे नातू अजिजुद्दीन खॉंसाहेब म्हणजेच बाबा आणि मी बाबांचा नातू. शास्त्रीय संगीत क्षेत्रात मी नसलो तरी म्युझिक कंपोझर म्हणून गेली तेरा वर्षे रेडिओमध्ये काम करतो आहे. आजवर दीड हजारांहून अधिक जिंगल्स केल्या असून, "बेटी बचाव' हे गाणं प्रसिद्ध गायक जावेद अली यांनी गायिलं होतं. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात केलेल्या "कोल्हापूर वाचवूया' या लॉकडाउन रॅपलाही मोठा प्रतिसाद मिळाला. 
- बद्रुद्दीन ऊर्फ टिंकू खॉं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com