
कोल्हापूर ः पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी विशेषत: चिखली, आंबेवाडी ग्रामस्थांनी त्वरित स्थलांतरित व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज केले. याचवेळी जनावारांनासुद्धा स्थलांतरित करावे, अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असेही आदेश जिल्हाधिकारी देसाई यांनी आज दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी संपर्क साधून आढावा घेतला.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ""दिवसाला सरासरी 150 मिमी पाऊस पडत असल्याने नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे आज रात्रीच राजाराम बंधारा येथील इशारा पातळी ओलांडली जाईल. त्यामुळे नागरिकांच्या स्थलांतराला तत्काळ सुरवात करावी.
नागरिकांनीही विशेषत: नदीकाठच्या गावातील लोकांनी जनावरांसह सुरक्षितस्थळी स्थलांतरित होऊन प्रशासनाला सहकार्य करावे. गावा-गावांत दवंडी देऊन नागरिकांना सावधानतेचा इशारा देउन सतर्क करा. ज्या गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशा ठिकाणी पर्यायी मार्गाचा सक्तीने वापर करायला लावा. ज्या रस्त्यांवर पाणी आले आहे, तेथे बॅरिकेड्स लावून सुरक्षारक्षकांची नेमणूक करा. कोणताही धोका निर्माण होणार नाही.
पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले, ""सर्व पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या असून, पब्लिक ड्रेस सिस्टीमचा वापर करून बाधित गावांमधील नागरिकांना आजच स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या.''
पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी जिल्ह्यातील धरणे, पाणीसाठा, पडणारा पाऊस, करण्यात येणारा विसर्ग आणि हवामान विभागाने दिलेला इशारा याबाबत माहिती दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.
कोरोना रुग्णाची पर्यायी मार्गाने व्यवस्था
संपर्क तुटलेल्या गावांमध्ये कोविडचे रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्या उपचारासाठी पर्यायी मार्गाने सुविधा करा. ऑक्सिजनची सुविधा ठेवा, कोविड रुग्णांसाठी स्थलांतर करताना योग्य अंतर ठेवा, ज्यांचे स्वॅब घेतले आहेत, संशयित आहेत. त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवा. व्हेंटिलेटर्स उपलब्ध ठेवा. मंगल कार्यालय, शाळा, महाविद्यालयांचे वसतिगृह आदी ठिकाणी नियोजन करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी दिल्या. लाईफ जॅकेटची सक्ती
ज्या गावांमध्ये स्थानिक बोटी आहेत विशेषत: शिरोळ तालुक्यात त्या बोटी चालवण्यासाठी लाईफ जॅकेट सक्तीने असले पाहिजे. त्यासाठी गावांमध्ये 10-10 लाईफ जॅकेट द्यावेत. प्रत्येक तालुक्याला रेस्क्यू फोर्सचे वाटपाची माहिती घ्या. जनावरांना स्थलांतरासाठी प्राधान्य द्या. पहिल्या टप्प्यात बाधित होणाऱ्या गावातील कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करा.
अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये
प्रत्येक गावात तलाठी, ग्रामसेवकासह सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत मुख्यालय सोडू नये. आपत्कालीन मुख्यालय सोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.