
इचलकरंजी : शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या निर्गतीचा प्रश्न नेहमीच भेडसावत आला आहे, पण हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर त्याच दिवशी प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रकल्पाची नजीकच्या काळात उभारणी करण्यात येणार आहे, तर सध्या आसरानगर येथे साचून राहिलेल्या कचऱ्यावरील प्रक्रियेचा प्रस्तावही शासन दरबारी पाठवला आहे. त्यामुळे लवकरच कचऱ्याच्या प्रश्नातून इचलकरंजीची मुक्तता होणार आहे.
शहरात दररोज सरासरी 100 टन कचरा निर्मिती होते. त्यावर दररोज प्रक्रिया करण्याचे नियोजन पालिकेकडून केले आहे. यासाठी आसरानगर कचरा डेपो येथे नवीन प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेल्या कचऱ्यापासून खतनिर्मितीसह इंधन विटा तयार केल्या जाणार आहेत. त्या विटा उद्योग क्षेत्रातील बॉयलरसाठी वापरता येणार आहेत. 3 कोटी 25 लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यानंतर मक्तेदार कंपनीस पाच वर्षांच्या कराराने वार्षिक 3 कोटी रुपये देखभाल दुरुस्तीचा खर्च देऊन चालवण्यास देण्यात येणार आहे.
त्याबाबतची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची त्याच दिवशी निर्गत होणार आहे. शिवाय खत अथवा इंधन विटा विक्रीतून मक्तेदार कंपनीस मिळणाऱ्या नफ्यातील 50 टक्के रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी हा प्रकल्प कार्यान्वित होईल, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार यांनी दिली.
घातक कचऱ्यावर स्वतंत्र प्रक्रिया
दररोज कचऱ्यावर होणाऱ्या प्रक्रियेतून घातक कचरा बाजूला केला जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र प्रक्रिया राबवली जाणार आहे. 2 कोटी 59 लाखांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या द्रवावर प्रक्रिया करणारा स्वतंत्र 65 लाखांच्या प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या द्रवाचा वापर उद्यान विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी 9 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या आसरानगर कचरा डेपोच्या ठिकाणी रिकाम्या झालेल्या विस्तीर्ण जागेवर हा प्रकल्प आकारास येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस
शहरात बाजार व हॉटेलमधून दररोज सरासरी 5 टन कचरा निर्माण होतो. त्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे. याद्वारे बायोगॅसची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे ओल्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
शिल्लक कचऱ्यासाठी 22 कोटींचा प्रस्ताव
सध्या आसरानगर डेपोतील 2 लाख क्युबिक मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली आहे. अद्याप साडेचार लाख क्युबिक मेट्रिक टन कचरा शिल्लक आहे. त्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प उभारणीसाठीचा 22 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
संपादन - सचिन चराटी
kolhapur
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.