
कोल्हापूर : गटारीत पाणी सोडण्याचे मार्ग तयार करण्याचा निर्णय
कोल्हापूर : राजारामपुरी चौकात पाणी साठू नये यासाठी आयआरबीच्या फुटपाथखालील गटारीत पाणी सोडण्याचे मार्ग तयार करण्याबरोबरच त्या परिसरातील कचरा थांबवण्यासाठी चेंबर बांधण्याचे नियोजन करण्यात आले. आम्हाला पूर नको अभियानाच्या कार्यकर्त्यांनी आज राजारामपुरी परिसरातील नालेसफाईची उपायुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, नगररचनाचे सहाय्यक संचालक रामचंद्र महाजन यांच्यासोबत पाहणी केली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले.
सकाळी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करताना ॲड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांनी अनेक चेंबर उघडून साफ केले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याबाबत उपायुक्त आडसूळ यांनी तातडीने स्वच्छता करण्याच्या तसेच विभागीय कार्यालयाचे उपशहर अभियंता बाबूराव दबडे यांना नवीन बांधकामाच्या सूचना केल्या. सर्वांच्या पाहणीनंतर राजाराम गार्डनसमोरील आयआरबीचा स्ट्रॉम वॉटरचा चेंबर तसेच जनता बझारसमोरील चेंबर उघडून साफ करण्याचे ठरवले. जनता बझार चौकाच्या दोन्ही बाजू, मटण शॉपकडील चॅनेल, जगदाळे हॉलसमोरील चॅनेल, वाघाडिया दवाखान्यासमोरील चॅनेल साफ करण्याचे ठरवण्यात आले.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताराराणी विद्यापीठाकडील रस्त्यावरून येणारे पाणी गटारीत जाण्यासाठी तेथील गटारीसाठी नवीन मार्ग काढण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी पाऊस पडत असताना पाहणी करून कोठून पाणी गटारीत जाऊ शकते, अशा ठिकाणी मार्ग तयार केले जाणार आहेत. तसेच वाहून येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या तसेच कचरा पुढे जाऊ नये व तो काढता यावा यासाठी नवीन चेंबर बांधण्याचे एस्टीमेट करून तातडीने बांधकाम करण्यात येणार आहे.
Web Title: Kolhapur Decision Construct Drainage System
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..