कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणाचा फटका विविध घटकांना बसतो

हातकणंगले तालुक्यात जमीन बनतेय नापीक
Panchganga pollution issue notice to Municipal Corporation
Panchganga pollution issue notice to Municipal Corporationsakal

जयसिंगपूर: पंचगंगा प्रदूषणाचा फटका विविध घटकांना बसत आहेत. मनुष्य आणि जलचर प्राण्यांना धोकादायक बनलेल्या पंचगंगेच्या पाण्याने नदीकाठच्या जमिनीही नापीक बनून उत्पादकतेवर मोठा परिणाम जाणवत आहे. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील शेतकरी विशिष्ट कालावधीत जनावरांना नदीचे पाणी पाजण्यासही धजावत नाहीत. दुसऱ्या बाजूला रसायनयुक्त पाण्यामुळे मोटारपंप आणि जलवाहिन्याही गंजू लागल्या आहेत.

मासेमारीच्या जाळ्या या पाण्यामुळे कमकुवत होतात. त्यामुळे बागडी समाजाला वारंवार याचा आर्थिक फटका बसत आहे. प्रदूषणाचा सर्वाधिक फटका शिरोळ आणि हातकणंगले तालुक्याला बसू लागला आहे. जिल्ह्यातील समृद्ध आणि नगदी पिकांची गावे म्हणून या दोन तालुक्यांची ओळख आहे. अधिकांश विभागात शेती आणि शेतीशी निगडित उद्योग हेच येथील उदरनिर्वाहाचे मुख्य साधन आहे. शेतीतील विविधतेतही सातत्य आहे. ऊस, निर्यातक्षम भाजीपाला आणि फुलाच्या उत्पादनामुळे भागाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. दूध उत्पादनाच्या समृद्ध पट्ट्यात दुधापासून बनवलेले विविध पदार्थ देशाच्या कानाकोपऱ्यात जात आहेत. मात्र, आता मानवनिर्मित अडथळे या व्यवसायात संकट म्हणून उभे राहिले आहेत. पंचगंगा नदी प्रदूषणामुळे तर येथील शेतीच भविष्यकाळात उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रदूषित पाण्यामुळे दूषित बनत चाललेल्या जमिनीत केवळ उत्पादन कमी होत नाही तर उत्पादनातही आरोग्याला अपायकारक घटक दिसून येऊ लागले आहेत. त्यामुळे येथील उत्पादनाचा बाजारपेठेवरही परिणाम होण्याची भीती आहे. मुळात शिरोळ तालुक्यात क्षारपडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अशातच पंचगंगेचे पाणी जमिनीत मिसळल्याने हा प्रश्‍न आणखी बिकट होत चालला आहे. प्रदूषित पाण्यामुळे जमीन नापीक बनत चालली आहे. दुसऱ्या बाजूला पिकावू जमिनीतील उत्पादनावरही याचे परिणाम दिसत आहेत. पिकांच्या मुळापासूनच परिणाम होत आहे. वातावरणातील तसेच जमिनीतील नायट्रोजनचे स्थिरीकरण करणाऱ्या बॅक्टेरियाची संख्या घटल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम होऊन उत्पादनात घट होऊ लागली आहे. जे पाणी पिकाला पोहोचत आहे. त्यामध्ये लोह, कॅडमियम, पाऱ्याचे अंश आढळत आहेत.

प्रदूषित पाण्यातून उत्पादनाचा मानवी जीवनावर तत्काळ परिणाम होत नाही . मात्र, स्लो पॉयझनिंगमुळे अत्यंत गंभीर आजाराचे अनेकजण शिकार होत आहेत. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराबरोबरच रोगप्रतिकारशक्ती कमी होत जाते. सर्दी-पडसे या नियमित आजाराबरोबर संधिवातासारख्या आजाराला हे पाणी कारणीभूत ठरते. प्रजननशक्तीवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे प्रदूषणामुळे घुसमटणाऱ्या पंचगंगेला प्रदूषणमुक्त करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.

विहिरीही प्रदूषित

शेतीसाठी पाणी खेचणारे पंप, विहिरीचे बांधकाम आणि जलवाहिन्यांवरही प्रदूषित पाण्याचा विपरीत परिणाम होत आहे. शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांना औद्योगिक पाण्याचा मोठा फटका बसत आहे. ओढ्याद्वारे रसायनयुक्त पाणी नदीपात्रात जात असताना ओढ्यालगत शेतीमध्येही प्रदूषित पाणी झिरपत आहे. काहीवेळा पाऊस पडला तर हे पाणी थेट शेतात विहिरीला जाते. विहिरीतील केवळ पाणी दूषित होत नाही तर पाणी वाहून नेणाऱ्या मोटारी आणि जलवाहिन्या निकामी होत आहेत.

पंचगंगा प्रदूषणमुळे शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पिकाऊ जमिनीवर विपरीत परिणाम होत आहे. दूषित पाण्याने अनावश्यक घटकांची वाढ होऊन जमिनी नापीक होत आहेत. शासन आणि लोकचळवळीतून हा प्रश्‍न मार्गी लागू शकतो. गेल्या वीस वर्षांपासून याप्रश्‍नी आंदोलन सुरू आहे.

-विश्‍वास बालिघाटे,सामाजिक कार्यकर्ते, शिरढोण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com