कोल्हापूर-सांगली मृत्यूचा महामार्गच; चौपदरीकरणाच्या कामात अनेक त्रुटी

वाहतुकीचा बोजवारा; वाढत्या अपघातांना निमंत्रण
kolhapur sangli highway
kolhapur sangli highwaysakal media

हातकणंगले : राज्यातील सर्वाधिक अपघाती महामार्ग म्हणून सातत्याने चर्चेत असलेल्या कोल्हापूर-सांगली या राज्य महामार्गावरील अपघातांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. कंत्राटी पद्धतीने महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम हाती घेतले. मात्र, या कामात अनेक त्रुटी राहिल्या आहेत. यामध्ये अरुंद पूल, संरक्षक कठडे, दिशादर्शक फलकांचा अभाव यासह अनेक अर्धवट कामांनी वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. यामुळे अपघातात अनेकांचे बळी जात असून हा अक्षरशः मृत्यूचा महामार्ग बनला आहे. रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग केला आहे. मात्र, त्यानंतर केवळ घोषणा करण्यापलीकडे काहीच सुधारणा केली नाही. त्यामुळे हा ‘महामार्ग’ आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

सांगली-कोल्हापूर ४३ किमीसाठी १९६.६ कोटींचे हे काम २०१२ मध्ये मुंबईतील सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला मिळाले. २०१४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती; परंतु हे काम मुदतीत पूर्ण केले नाही. महामार्गावर अनेक अत्यावश्यक ठिकाणी गतिरोधक नसणे, दिशादर्शक फलकांचा अभाव असणे, गावांलगत सेवा मार्ग नसणे, वेगनियंत्रण नसणे, अशा एक ना अनेक त्रुटी या कामांमध्ये राहिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

हातकणंगले येथील बसस्थानक चौकातील उड्डाणपूल आजही अर्धवट आहे. येथे सर्वाधिक नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जातो. महामार्गावरील अरुंद पूल, संरक्षक कठड्यांचे अर्धवट बांधकाम व चोकाक फाट्यावरील एस. आकाराचे वळण यासह अतिग्रे येथे पाण्याची मोरी बांधली नाही. कोल्हापूरहून येत असताना अतिग्रे गावाजवळ रस्ता निमुळता होत गेल्याने हा परिसर अपघातास निमंत्रण देणारा ठरत आहे. या महामार्गावरील अनेक कामे योग्य पद्धतीने केली नसल्याचे स्पष्ट होत आहे. आता गॅस पाईपलाईनच्या निमित्ताने रस्ता खोदला आहे. या महामार्गाचे हस्तांतरण राष्ट्रीय महामार्गाकडे केल्याने या रस्त्याचे भाग्य उजळणार, असे वाटत असताना आजअखेर याकडे कोणीही लक्ष दिले नसल्याने वारंवार अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

अपघातग्रस्त ठिकाणे

महामार्गावरील अतिग्रे, इचलकरंजी फाटा, रुकडी फाटा, अतिग्रे, चोकाक फाटा, माले फाटा, हातकणंगले बस स्थानक, मजले फाटा आदी अनेक ठिकाणे मृत्यूचा सापळा बनली आहेत.

"सांगली-कोल्हापूर या महामार्गावरील रस्त्यांचे काम करण्यासाठी अंदाजे १९६ कोटी रुपयांची निविदा मंजूर होती. ठेकेदाराने अनेक महत्त्वाची कामे अपुरी ठेवली आहेत. रस्त्याचे हस्तांतरण झाले आहे. त्यामुळे रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे."

- बी. एल. हजारे, उपअभियंता, (वर्ग एक) सार्वजनिक बांधकाम विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com