कोल्हापूर: ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनाही घरी बसवू ; संजय राऊत

कोल्हापूरचे भविष्य ठरविण्याचा शिवसंपर्क मेळाव्यात निर्धार
 शिवसेना नेते खासदार संजय राऊत
शिवसेना नेते खासदार संजय राऊत sakal

कोल्हापूर: वेळ आली तर ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्यांनाही घरी बसवू. कोल्हापूरचा महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही. पडद्यामागचे राजकारण बंद करा. शिवसेनेला डावलण्याचा प्रयत्न केला तर खुर्च्या हलवून टाकू, पैशांची मस्ती इथे दाखवू नका, असा खणखणीत इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांचे नाव न घेता दिला. प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. शिवसंपर्क अभियानांतर्गत ते आज जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.

ते म्हणाले, ‘‘कोल्हापुरात आघाडी-बिघाडी पुन्हा पाहू. विधानसभेत ज्यांचा पराभव झाला, त्या सहा आमदारांना परत आणू. आम्ही ठरविले म्हणून राज्य आले. ठाकरे सरकार आहे, सगळे आम्हीच ठरविणार. आता कोल्हापूरचे भविष्य शिवसेनाच ठरविणार. जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना पुन्हा ताकदीने उतरेल. जिल्ह्यात शिवसेनेचे तीन खासदार असतील, असे सांगून जिल्हाप्रमुख संजय पवार यांचा विजय निश्‍चित असल्‍याचेही त्यांनी स्पष्ट केले.’’

कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महापौर शिवसेनेच्या मदतीशिवाय होणार नाही, असे सांगून राऊत यांनी आगामी सर्व निवडणुका जिंकण्यासाठीच लढवायच्या असल्याचेही सांगितले. ‘आमचं ठरलंय’ असे चालणार नाही. नाही तर तुमच्याशिवाय काय करायचं याची गुरुकिल्ली आमच्याकडे आहे, असाही इशारा दिला.

तुम्ही आमच्या हिंदुत्वाची काय बरोबरी करणार? छातीवर वार झेलणारे आमचे हिंदुत्व आहे. तुमच्यासारखं पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व नाही, असा टोलाही विरोधकांना लगावला. १५ जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. बाबरी पाडण्यापासून ते राम मंदिराची वीट रचण्यात शिवसेनेचा वाटा आहे. तरीही विरोधक तुमचा संबंध काय, असे विचारतात. बाबरी पाडल्यावर तुम्ही पळून गेला, तेव्हा आमच्या शिवसैनिकांच्या मागे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे उभे राहिल्याचीही आठवण त्यांनी करून दिली.

कोल्हापूरचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनीही आठ आमदार झाले पाहिजेत. महापालिकेत चार नव्हे, तर शिवसेनेशिवाय महापौर होणार नाही, याची व्यवस्था करायची असल्याचे आवाहन केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर रुग्णालयात असल्याने त्यांनी पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. त्यांच्यातर्फे खासदार राऊत यांचा सत्कार ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते झाला. या वेळी त्यांना तलवार भेट देण्यात आली.

आम्ही येऊन दाखवितो

मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, असे आम्ही म्हणत नाही. आम्ही येऊन दाखवितो आणि आल्यावर घालवून दाखवा, असे सांगतो. अडीच वर्षे झाली, तीन पक्षांचे सरकार आजही चांगले चालते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाच वर्षांचे सरकार चालवतील. खासदार सुप्रिया सुळे यांनीही पुढील २५ वर्षे हे सरकार असेल, असे सांगितल्याचे राऊत यांनी जाहीर केले.

‘फटे, लेकीन हटे नहीं’

भाजप हा सर्वाधिक भ्रष्ट पक्ष आहे. त्यांच्याकडे साडेपाच हजार कोटींचा निधी आला कोठून? व्यापाऱ्यांचे राज्य फार काळ चालत नाही. २०२४ मध्ये केंद्रातही सत्ताबदल होईल. औरंगजेबचाही जन्म गुजरातचा आहे; पण त्याला महाराष्ट्रात गाडल्याचे सांगून आजही दिल्लीशी झगडावे लागतेय, असे राऊत यांनी सांगितले. दिल्लीत काँग्रेसचे राहुल गांधींनीही शिवसेनेच्या बांधणीबद्दल विचारले, तेव्हा मी म्हणालो, ‘फटे, लेकीन हटे नहीं’ हा आमचा कानमंत्र आहे.

श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांचे आभार

महाराष्ट्रात शिवसेनेला बदनाम करण्याचा जो प्रयत्न देवेंद्र फडणवीस आणि कंपनीने सुरू केला होता, त्याचा मुखवटा आज याच कोल्हापुरातील श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी फाडला. कोल्हापूरच्या भूमीत आजही सत्य आहे, प्रामाणिकपणा आहे. शाहू घराण्याने अद्यापही सचोटी धरून ठेवली आहे. ज्या जागेशी संभाजीराजेंचा वाद सुरू आहे, तो निरर्थक आहे. शिवसेनेने छत्रपती घराण्याचा अवमान केलेला नाही. आजही मी मनाने शिवसैनिक असल्याचे शाहू महाराज म्हणाल्याचे राऊत यांनी जाहीर केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com