कोल्हापूर : हळद बदलेल शेतकऱ्यांचे गणित

हळदीला आयुर्वेदामध्ये; पर्यायाने मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे.
हळद
हळद

हळद बदलेल शेतकऱ्यांचे गणित

लग्न, शुभकार्यासह आहारात अविभाज्य घटक असलेल्या हळदीचे महत्त्व विविधांगी आहे. यामध्ये मूलतः औषधी गुणधर्म असल्यामुळे हळदीला आयुर्वेदामध्ये; पर्यायाने मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. हळदीची लागवड अगदी प्राचीन काळापासून भारतात होत आली आहे. गडहिंग्लज उपविभागातील आजरा, गडहिंग्लज व चंदगड तालुक्यांत आजही शेतकरी आपल्या परसबागेत हळद पिकवतो आहे. हळदीचे व्यावसायिक महत्त्व मात्र अजूनही शेतकऱ्यांना उमगलेले नाही. काही प्रयोगशील शेतकरी व्यापारी तत्त्वावर हळदीची लागवड करीत आहेत. हे प्रयोग येथे यशस्वी झाले असून त्यांना स्थानिक बाजारपेठेसह कार्पोरेट बाजारपेठ खुणावू लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यावसायिक तत्त्वावर हळदीची लागवड केल्यास हे पीक येथील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बदलून टाकेल.

- रणजित कालेकर, आजरा

- अजित माद्याळे, गडहिंग्लज

- सुनील कोंडुसकर, चंदगड

पारंपरिक पद्धतीने हळदीचे उत्पादन

शेकडो वर्षांपासून गडहिंग्लज उपविभागातील शेतकरी हळदीचे उत्पादन घेत आला आहे. यासाठी ते स्थानिक राजापुरी हळद या पारंपरिक देशी वाणाचा वापर करत आहेत. सेंद्रिय पद्धतीने परसबागेमध्ये ते उत्पादन घेत असतात. कुंडी, परसबागेतील मोकळ्या जागेपासून ते दहा गुंठे क्षेत्रावर पीक घेणारे असंख्य शेतकरी आहेत. पण यांची नोंद कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे या तीन तालुक्यांत पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊन देखील हळदीचे पीक मात्र दुर्लक्षित राहिले आहे. शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर पिकाची नोंद होणे गरजेचे आहे.

वन्य प्राण्यांपासून नुकसान नाही

आजरा, गडहिंग्लज व चंदगड या तीन तालुक्यांत हत्ती, गवे व अन्य वन्य प्राण्यांमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी शेतीतून बाहेर पडत आहेत. या तीन तालुक्यांत जंगलाकडील शेती पड पडत चालली आहे. हे चित्र शेतीउद्योगासाठी फारसे चांगले नाही. हे पाहता पर्यायी पीक म्हणून हळदीकडे पाहता येईल, असे शेतीतज्ज्ञ सांगतात. कारण हळदपिकाचे हत्ती, गवे व अन्य वन्य प्राणी नुकसान करीत नाहीत. त्यामुळे जंगलाकडील व पड जमिनीवर हे पीक घेणे फायदेशीर ठरू शकते.

पोषक हवामान

या तीन तालुक्यांत हळदीच्या पिकासाठी पोषक हवामान आहे. हळदीच्या पिकाला सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे हवामान चांगले मानवते. वाढीच्या काळात तीस अंश सेंटिग्रेट व समशितोष्ण हवामान मानवते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात जास्त थंड हवामान असल्यास गड्डा चांगला पोसतो. एप्रिल ते मे महिन्यातील तीस ते पस्तीस अंश सेंटिग्रेट तापमान हळदीच्या उगवणीसाठी अनुकूल असते, तर पिकाच्या वाढीसाठी गरम व दमट हवामान अनुकूल असते. समुद्रसपाटीपासून १५०० मीटरपर्यंतच्या सर्व प्रदेशांत हळदीचे पीक चांगले येऊ शकते.

जमीन

मध्य काळी, भुसभुशीत पिकाचे उत्तम पोषण होईल, अशी कसदार गाळाची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन हळद लागवडीसाठी उपयुक्त असते. पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत किंवा कमी निचऱ्याच्या जमिनीत कंद नासणे हा रोग मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे क्षारयुक्त, पाणथळ, चिबड, कमी निचऱ्याच्या व कडक होणाऱ्या जमिनीत हळद चांगली येत नाही म्हणून अशा जमिनी टाळाव्यात.

बियाणे

हळद लागवड करत असताना योग्य जातीचे बियाणे निवड करून घेणे महत्त्वाचे असते. जातीपरत्वे हळद काढण्यास सात ते नऊ महिने लागतात. आंबेहळदीसारख्या हळव्या जाती लागवडीपासून सहा ते सात महिन्यांत काढणीस येतात. निमगरव्या जाती सात ते आठ महिन्यांत काढणीस येतात. सेलम व कृष्णा गरव्या जाती आठ ते नऊ महिन्यांत काढणीस येतात. त्यामुळे हळद लागवडीपूर्वी उपलब्ध पाणीसाठ्यानुसार योग्य त्या जाती निवड गरजेचे असते. हळद लागवडीसाठी जेठा गड्डे, बगल गड्डे आणि हळकुंडे बेणे म्हणून वापरले जाते.

आंतरमशागत

हळदीचे कोंब उगवणीच्या काळात तण वाढू देऊ नये. त्यामुळे हळदीच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. वेळोवेळी आवश्यकतेनुसार खुरपणी करून तण काढावे. एक ते दीड महिन्यांनी खतांची मात्रा देताना हळदगड्ड्याच्या बाजूला हलकी कुळवणी करून पिकाला मातीची भर द्यावी. यालाच ‘उठाळणी’ असेही म्हटले जाते. त्यामुळे तंतूमुळे तुटून नवीन फूट येण्यास मदत होते. तसेच गड्ड्यांच्या भोवतालची माती भुसभुशीत झाल्याने कंदाची वाढ चांगली होते. ज्या ठिकाणी कठीण किंवा कडक जमीन झाली असेल, त्या ठिकाणी झाडांची वाढ होत नाही व कंद पोसत नाहीत.

हळदीचा वापर

हळदीला धार्मिक, आर्थिक, औषधी व सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. हळदीचा उपयोग रोजच्या आहाराबरोबर औषधे, सौंदर्य प्रसाधने, जैविक कीटकनाशके आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यातही मोठ्या प्रमाणात होतो. धार्मिक विधी, विवाह संस्कार, पूजा, भंडारा, गौरी गणेशातील ववसा पूजन, पांडवपूजेतील खाद्यपदार्थ यासह विविध उकडी पदार्थ आदींसाठी हळद, हळकुंड आणि हळदीच्या पानांचा वापर होतो.

मिश्र पीक पद्धतीने अधिक उत्पन्न

हळदीमध्ये मिश्र पीक म्हणून मिरची, घेवडा, कोथिंबीर, मूग, उडीद, मुळा, भुईमूग आदी मिश्र पीक घेतल्यास शेतकऱ्यांना अधिक आर्थिक फायदा मिळू शकतो. हळदीबरोबर अन्य पिकांच्या उत्पादनातून शेतकरी चांगली आर्थिक कमाई करू शकतात.

हळदीमधील औषधी गुणधर्म

आयुर्वेदातील शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्त शुद्धिकारक, बलवर्धक, कृमीनाशक, आम्लपित्तहारक, भूक वाढविणारी आहे. हळदीमुळे त्वचेचा रंग उजळतो. तसेच रक्तशुद्धीसाठी गुणकारक आहे. पायावर सूज आल्यास हळद, गूळ व गोमूत्र गरम करून प्यावे, हळद डोळ्यांच्या विकारावरही गुणकारी आहे. डाळीच्या पिठात थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व चार ते पाच थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, अंगावरील खाज दूर होऊन पूर्ण अंगकांती सुधारते.

हळदीबाबत ‘पेटंट’ची लढाई

अमेरिकेने हळदीचे ‘पेंटट’ १९९५ ला घेतले होते. यावर भारत सरकारतर्फे कौन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्चचे (सीएसआयआर) या संस्थेने आक्षेप घेतला होता. याबाबत झालेल्या कायदेशीर लढाईत भारताला यश आले. ‘सीएसआयआर’ या संस्थेचे संचालक व शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बाजू भक्कमपणे मांडली होती. हळद हा आमचा राष्ट्रीय गौरव असून पुरातन काळापासून तिचा आयुर्वेदिक व धार्मिक कामासाठी उपयोग होत आला आहे. भारतीय संस्कृतीत दैनंदिन जीवनात हळदीचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत असतो, या भूमिकेमुळे हळद ही भारताची असल्याचे उघड झाले आणि अमेरिकाला ‘पेटंट’ सोडावे लागले.

ब्रँडिंग व पॅकेजिंग

महाराष्ट्रात सांगली ही सर्वांत मोठी हळद बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. येथे वर्षभर मोठ्या प्रमाणात हळदीची खरेदी आणि विक्री होते. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन हळदीवर प्रक्रिया करून उत्पादित झालेल्या मालाचे योग्य ब्रँडिंग आणि पॅकेजिंग करून त्याची विक्री केल्यास चांगला दर मिळू शकतो.

सेंद्रिय हळद उत्पादन

पारंपरिक नैसर्गिक पद्धतीने येथील शेतकरी हळदीचे उत्पादन घेत आहेत. यासाठी राजापुरी हळद आणि अन्य देशी वाणांची येथे लागवड होते. हळद पिकाकडे व्यावसायिक आणि आर्थिक फायदा देणारे पीक म्हणून बघितले जात नसल्याने येथील हळदीचे उत्पादन तुलनेने कमी आहे. हवामानाची अनुकूलता लक्षात घेऊन व्यावसायिक पद्धतीने आणि सेंद्रिय हळद लागवडीतून चांगले उत्पन्न शेतकऱ्यांना मिळू शकते. या सेंद्रिय हळदीच्या विक्रीसाठी नवी बाजारपेठ शोधणे हे देखील तितकेच महत्त्वाचे राहील.

गडहिंग्लज उपविभागात हळद उत्पादनवाढीसाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. ‘आत्मां’तर्गत हळद उत्पादक शेतकरी गटबांधणी करून ‘प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्ननय’ योजनेंतर्गत प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित यावे व कृषी विभागाशी संपर्क करावा.

- भाग्यश्री पवार-फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज

गेली पाच वर्षांपासून शेतामध्ये हळदीचे पीक घेत आहे. या परिसरात हळद चांगली येते. उत्पादनही चांगले मिळते. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत असल्याने दरही चांगला मिळतो. स्थानिक बाजारपेठेत प्रतिकिलो अडीचशे रुपये दराने विक्री करीत आहे. या परिसरात प्रक्रिया उद्योग उभारल्यास मोठ्या संख्येने शेतकरी हळद लागवड करतील.

- भिकाजी पाटील, प्रगतशील शेतकरी, आजरा

अनेक वर्षांपासून आम्ही परसात हळदीची लागवड करतो. कुटुंबाची गरज भागवून नातेवाईकांना पुरवठा करतो. या विभागात हळदीला पोषक वातावरण आहे. बाजारपेठ व योग्य दर मिळाल्यास शेतकरी या पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळतील.

- अजय पवार, हेरे, चंदगड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com