Kolhapur : कोल्हापूर अर्बन बँक‘शाहू’ ‘मराठा’ होऊ नये

शताब्दी वर्षाच्या परंपरेला गालबोट; सहकारात चांगल्या नेतृत्वाची गरज
kolhapur
kolhapursakal

कोल्हापूर : ठेव मिळत नाही म्हणून कोणीतरी अफवा उठवली आणि पाहता-पाहता मराठा बँक बंद झाली. संचालकांच्या अंतर्गत वादात शाहू बँकेवर विलीनीकरणाची वेळ आली. बलभीम बँकेचीही काहीशी अशीच स्थिती. एका माजी नगरसेवकाच्या अट्टाहासामुळे चांगली चाललेली कोल्हापूर जनता बँक बुडाली. एकेकाळी शहराच्या विकासात, सामान्य माणसाला उभा करण्यात, सहकार चळवळ टिकविण्यात ज्या बँकांचा पुढाकार होता, त्याच बँकांच्या वाटेवर कोल्हापूर अर्बन बँकेची वाटचाल होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

बँकेच्या व्यवहारावर सभासदांची नजर असावीच. किंबहुना बँकेच्या संचालकांवर सभासदांचा वचक आहे याची जाणीव होते. त्यातून बँकेचा व्यवहारही पारदर्शी होण्यास मदत होते; पण त्यावर जाहीर आरोप करून बँकेच्या अस्तित्वालाच धोका बसेल अशी कृत्ये झाल्यानेच शहरातील बहुजन समाजाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँका बंद पडल्या. याच बँका एकेकाळी फेरीवाल्यापासून ते मोठ्या उद्योजकांसाठी आधारवड होत्या. या बँकांत नोकरी म्हणजे लग्न ‘फिक्स’च अशी स्थिती होती. अनेकांच्या आधाराचे साधन बनलेल्या बँका एक-एक करत बंद पडल्या. त्याची पुनरावृत्ती ज्या शिल्लक बँका आहेत, त्यांच्या बाबतीत होऊ नये.

शंभर वर्षांपूर्वी सावकार हाच सामान्यांना पैसे उपलब्ध करून देणारा एकमेव स्त्रोत होता. या सावकारांच्या पठाणी व्याजातून आणि त्रासातून सामान्यांची सुटका व्हावी म्हणून १०९ वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने कै. भास्करराव जाधव यांनी कोल्हापूर अर्बन बँकेची स्थापना केली. कालपर्यंत या बँकेची सभा झालेलीही कळत नव्हती; पण त्याच बँकेच्या कारभाराला दोन दिवसांपूर्वी झालेल्या सभेतून गालबोट लागले.

मंगळवार पेठेतील शाहू बँक असो किंवा शिवाजी पेठेतील बलभीम बँक. या बँकांचा लौकिक आणि त्यांची झालेली अधोगती आपल्या डोळ्यासमोर असताना पुन्हा त्याच वाटेवर आपण जाणार आहोत का? याचा विचार होण्याची गरज आहे. कोल्हापूरची ओळख सहकारी पंढरी अशी आहे. तेथे एक-एक बँका चुकीच्या कारभाराने बंद होत आहेत. याचा सहकारात काम करणाऱ्यांना गांभीर्याने विचार करावा लागेल.

सहकारी संस्थांत काम करणाऱ्या चांगल्या नेतृत्वाची सध्या वानवा आहे. कोरोनामुळे सगळ्याच बँकांचे ‘एनपीए’चे प्रमाण वाढले. कर्जाची मागणीही घटली. वसुलीला त्रास होतो. नवीन बँकिंग रेग्युलेशन ॲक्टचाही मोठा धोका बँकांना आहे. या ॲक्टमुळे आठ वर्षे झालेल्या संचालकांना बदलावे लागेल. बँकांच्या निवडणुका होतात. त्यात कोणाला संधी मिळेल, हे सांगता येत नाही. तरुण पिढी सहकाराकडे वळत नाही. अशा परिस्थितीत सहकारात चांगल्या नेतृत्वाची गरज आहे.

- निपुण कोरे, अध्यक्ष, नागरी बँक असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com