कसबा  बावड्यातील गुऱ्हाळघरे इतिहासजमा

The only gurhalghar in Kasba Bawda has not started this year
The only gurhalghar in Kasba Bawda has not started this year

कोल्हापूर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून गुऱ्हाळ घरांची परंपरा असलेल्या येथील गुऱ्हाळघरे यावर्षी इतिहासजमा झाली. गेल्यावर्षीपर्यंत सुरू असलेले एकमेव गुऱ्हाळ घरही यावर्षी बंद झाल्याने भविष्यात या भागात गुऱ्हाळघरे दिसण्याची शक्‍यताच नाही. 
बावड्यात गेल्या अनेक वर्षापासून गुऱ्हाळ घराची मोठी परंपरा होती. तब्बल 21 गुऱ्हाळघरे होती. त्यातही माळी, खुळे-पाटील, रमणमळा येथील बेडेकर यांच्या गुऱ्हाळ घरांची घरघर तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ऐकायला मिळत होती. या गुऱ्हाळ घरावर काम करण्यासाठी कर्नाटकातील विजापूर, भुदरगड तालुक्‍यातील गारगोटी आणि परिसर, गगनबावडा तालुक्‍यातील साळवण गावातील लोकांच्या टोळ्या तयार असायच्या. वर्षानुवर्षे एकच टोळी एकाच गुऱ्हाळ घरावर काम करत होती. त्यातून गुऱ्हाळ घर मालक आणि कर्मचारी यांच्यात एक स्नेहाचे आणि आपुलकीचे नातेही तयार झाले होते. 
दसऱ्यापूर्वी महिनाभर या गुऱ्हाळ घरांची तयारी करावी लागायची. त्यात घाण्याची दुरूस्ती, कायलीची आणि चुलवानाची डागडुजी यांचा समावेश असायचा. फडात आणि गुऱ्हाळात काम करणाऱ्या टोळ्या ठरलेल्या असायच्या, देखभाल दुरूस्तीचे काम झाले की अनेक गुऱ्हाळ मालक दसऱ्याच्या मुहूर्तावर गूळ उत्पादनाला सुरूवात करत होते. गेल्या पाच-दहा वर्षात मात्र या गुऱ्हाळ घरांना घरघर लागायला सुरूवात झाली. 
नव्या पिढीने या व्यवसायाकडे फिरवलेली पाठ, उत्पादन खर्चाच्या तुलनेत गुळाला मिळणारा कमी दर आणि टोळ्यांकडून होत असलेली फसवणूक याला कंटाळून मालकानीच गुऱ्हाळघर बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यातही या परिसरात नदी, विहीरीपेक्षा सांडपाण्यावर पिकणाऱ्या ऊसाचे क्षेत्र जास्त आहे. या पाण्यामुळे गुळाचा गोडवा कमी आणि खारटपणा जास्त असायचा. त्यातून या गुळाला दर कमी मिळत होता. त्यामुळे हळूहळू एक एक करत बावड्यातील सर्वच गुऱ्हाळ घरे बंद झाली. काहींनी या गुऱ्हाळ घरांच्या जागेवर नव्या व्यवसायाला सुरूवात केली, तर काहींनी साहित्य विकून त्यातून सुटका करून घेतली. गेल्यावर्षीच्या हंगामात प्रभाकर पाटील-बडबडे यांचे एकमेव गुऱ्हाळघर सुरू होते, तेही यावर्षी बंद झाल्याने बावड्यातील गुऱ्हाळ घरांचा इतिहास आता जुन्या जाणत्या लोकांकडूनच ऐकायला मिळणार असे वाटते. 

यांची होती गुऱ्हाळघरे 
कै. शत्रुघ्न पाटील-रकटे, कै. बाबुराव सरनाईक, कै. हिंदुराव उलपे-जमदग्नी मळा, गोविंद उलपे, हरी पाटील-कोल्हे, शामराव कोळी, कै. विश्‍वास नेजदार, कै. माधवराव बेडेकर, आण्णा बखारवाले-चौगले, कै. जयवंत पाटील, वसंत पाटील, प्रभाकर पाटील-बडबडे, कै. बापुसो पाटील-खुळे, रूपेश पाटील-खुळे, आनंदा माळी, राजू रेणुसे, विलास रेणुसे, कै. दिनकर पाटील, बुकशेठ, कै. राजाराम पाटील, कै. पांडूरंग दत्तात्रय चौगले. 

कर्मचाऱ्यांची वानवा, उत्पादन खर्चापेक्षा कमी मिळणारा दर आणि टोळ्याकडून होणारी फसवणूक यामुळे हा व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. त्यात गुऱ्हाळ मालकाला फायदा कमीच मिळत होता हेही एक कारण गुऱ्हाळघरे बंद होण्यामागे आहे. 
राजू सरनाईक, गुऱ्हाळघर मालक 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com