कोल्‍हापूर : सेंद्रिय शेतीसाठी प्रबोधन करा

कृषी समितीच्या बैठकीत सविस्‍तर चर्चा
Organic farming
Organic farming sakal

कोल्‍हापूर : पंचगंगा नदीचे प्रदूषण वाढत चालले आहे. यात उद्योगांसह शेतीपासून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाणही अधिक आहे. शेतामध्ये वापरली जाणारी रासायनिक खते, किटकनाशके ही अत्यंत घातक आहेत. या सर्व खतांचा वापर हा मुख्यत: उस पिकासाठी केला जातो. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये होणाऱ्या उस शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्याबाबत आणि महापुरामुळे नुकसान हो‍णाऱ्या शेतीमध्ये बीट शेतीच्या लागवडीबाबत प्रबोधन करा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्‍हाण यांनी दिल्या. आज झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सर्व तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी उपस्‍थित होते.

देशातील प्रमुख प्रदूषित नदीमध्ये पंचगंगा नदीचा समावेश आहे. या प्रदूषणास अनेक घटक कारणीभूत आहेत. यामध्ये शेतीशी संबंधित प्रदूषणही अत्यंत महत्त्वा‍चे आहे. नदी काठावर मोठ्या प्रमाणात उसाची शेती करण्यात येते. या शेतीला रासायनिक खतांची मात्रा दिली जाते. तसेच किटकनाशकांचाही वापर होतो. हेच पाणी पाझरून किंवा पाटाने थेट नदीत मिसळते. परिणामी नदीचे प्रदूषण वाढते. जलचरांवरही त्याचा परिणाम होतो. हे सर्व आरोग्याला घातक असल्याने याबाबत शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे आवश्यक असल्याचे चव्‍हाण यांनी सांगितले.

नदीकाठावर उसाची शेती असल्याने ती न करता अन्य शेती करावी, अशा सूचना देणे व्यवहार्य नाही; मात्र या उसाच्या पिकासाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आज शेतीचे उत्‍पन्‍न वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीची सेंद्रिय खतं उपलब्‍ध आहेत. या खतांचा वापर करावा यासाठी कृषी समितीकडून काही अनुदान देता आले तर ते देण्याचीही विभागाची तयारी आहे, मात्र तत्‍पूर्वी संबंधित शेतकऱ्यांची माहिती संकलित करून त्यांना या खतांचे महत्त्‍व पटवून देतानाच नदी प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर व सजीवांवर कसा परिणाम होतोय याबाबतचे प्रबोधन करावे, अशा सूचना चव्‍हाण यांनी केल्या.

दर महिन्याला माहिती सादर करावी लागणार

दर महिन्याला कृषी समितीची बैठक घेतली जाते. यामध्ये केवळ चर्चा करण्यात येते. मात्र, पुढील मीटिंगमध्ये किती शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यांना नदी प्रदूषणाबाबत काय मार्गदर्शन केले, या मार्गदर्शनानंतर किती शेतकऱ्यांनी सेंद्रिय खतांचा वापर करण्यास सुरुवात केली, किती शेतकऱ्यांनी पीक पद्ध‍तीत बदल केला, याची माहिती पुढील बैठकीत सादर करावी लागणार आहे.

बुडीत क्षेत्रात बीट लागवडीला प्राधान्य

शिरोळ तालुक्यातील नदीकाठाचे बहुतांश क्षेत्र हे पाण्याखाली जाते. त्यामुळे उसाचे मोठे नुकसान होते. शेतकरी कर्जबाजारी होतो. या सर्वाला पर्याय म्‍हणून उसाऐवजी बुडीत क्षेत्रात बीट लागवडीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. बीटापासून साखरनिर्मिती होते. ते तंत्रज्ञानही उपलब्‍ध आहे. तसेच महापुराच्या पाण्यात जरी हे पीक गेले तरी मोठे नुकसान होत नाही. त्यामुळे या पीक पद्धतीचेही प्रबोधन करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com