चर्चा तर होणारच; 2 कट्टर राजकीय विरोधकांचा एकत्र प्रवास

जिल्हा बँक निवडणुकीचे निमित्त; एकेकाळचे कट्टर विरोधक आले एकत्र
चर्चा तर होणारच; 2 कट्टर राजकीय विरोधकांचा एकत्र प्रवास

कोल्हापूर : राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो आणि कुणी मित्र नसतो. याची प्रचिती शिरोळ तालुक्यात पाहायला मिळाली. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकेकाळचे जीवलग मित्र आणि अलीकडच्या काळातील कट्टर विरोधक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार उल्हास पाटील एकत्र आले. दोघांनी एकत्रित प्रवास केला. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने घडलेल्या घडामोडींची जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगली.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून दुरावलेल्या शेतकरी चळवळीतील दोन बलाढ्य मित्रांना, नेत्यांना एका कारखानदाराने एकत्रित आणल्याची खुमासदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. तालुक्याच्या पूर्वभागात दोघांना एकाच गाडीतून एकाच शिटवरून दौरा करताना पाहून शेतकरी मात्र आनंदित होत आहे. राजकारणात कोण कुणाचे शत्रू नसतात. जसा संवाद तसे पात्र उभे करावे लागते. उसाच्या दरावरून आंदोलनाचे रान उठविणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांची खूप घट्ट अशी मैत्री होती; परंतु २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडीत दोघांत दुरावा निर्माण झाला अन् एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक बनले. केडीसीसी बँकेच्या निमिताने हे दोन्ही बलाढ्य नेते तब्बल आठ वर्षांनी एकाच गाडीतून, एकाच सीटवरून मतदारांच्या गाठीभेटीसाठी फिरताना दिसत आहेत.

या दोघांना एकत्र आणण्याची किमया तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांकडून जिल्हा बँकेचे उमेदवार म्हणून घोषित झालेले श्री दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची आहे. त्यांनी आपल्या मोटारीत एकाच सीटवर माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांची आसन व्यवस्था केली खरी. मात्र राजू शेट्टी व उल्हास पाटील यांच्यातील अबोलपणा स्पष्ट दिसला. दोघांनीही आपापल्या खिडकीतून बाहेर पाहणे पसंद केले. चळवळीसाठी फिरतानाच्या आठवणी कदाचित त्या दोघांच्या मनात आल्या असाव्यात असे वाटते. पण दोघेही एकत्रित फिरल्याने शेतकऱ्यांना पूर्वीची संघटनेची ताकद एकवटल्याचे चित्र दिसल्यामुळे शेतकरी आनंदित दिसतो. अशीच मैत्री कायम ठेवा असे शेतकऱ्यांनी बोलूनही दाखवले आहे.

तर समीकरणे बदलणार

शेतकरी संघटनेचे सावकार मादनाईक हेही उल्हास पाटील यांच्यासोबत होते. यामुळे पूर्वीची मैत्री जिल्हा बँक निवडणुकीच्या माध्यमातून एकत्रित आली आहे. हे असेच राहिल्यास तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात, हेही तितकेच खरे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com