
कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या सुगम व दुर्गम शाळा अशी विभागणी करून होते. जे शिक्षक दुर्गम भागातील शाळेत तीन वर्षे काम करतात, त्यांची सुगम भागात बदली केली जाते, मात्र दुर्गम भागाचे निकष सोयीनुसार वापरले जात होते. त्यामुळे एकदा दुर्गम भागात तीन वर्षे नोकरी केली की, सोयीच्या ठिकाणी १० वर्षे होणारी बदली आता नवीन निकषाने थांबणार आहे. दुर्गम शाळेच्या निकषाचा विस्तार करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. दुर्गम भागात असलेल्या ३८० शाळांवरून ही संख्या १२० ते १५० होण्याची शक्यता आहे. दुर्गम भागात तीन वर्षे काम करून सुगम भागात परतीचा प्रवास करणाऱ्या या शिक्षकांची मात्र अडचण होणार आहे.
जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदलीसाठी विविध निकष आहेत. यातील महत्त्वाचा निकष हा सुगम व दुर्गम भागातील शाळा, असा आहे. ज्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था चांगली आहे, पावसाचे प्रमाण कमी आहे, मोबाईलला रेंज आहे, वन्यप्राण्यांचा त्रास नाही, अशा शाळा या सुगम भागात येतात. जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले व काहीअंशी करवीरचा भाग हा सुगम म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बदली करून घेण्यासाठी अनेक शिक्षकांकडून बोलीही लावली जाते. ज्याची ताकद, वशिला मोठा त्यांना या तालुक्यात काम करण्याची संधी दिली जाते. या तालुक्यात शिक्षकांचा अनुशेष शिल्लक राहत नाही.
नव्या निकषात याचा होणार विचार
शिक्षक बदली करताना ज्या ठिकाणी ‘बीएसएनएल’ची रेंज नाही, असा प्रदेश विचारात घेतला जातो. यात सुधारणा करून अन्य टेलिफोन कंपन्यांच्या रेंजचाही विचार केला जाणार आहे. हिंस्त्र प्राण्यांचा वावर विचारात घेताना मागील पाच वर्षांत मुनष्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती घेऊन मग निर्णय होणार आहे.
ज्या ठिकाणी एसटी जात नाही, ती गावे दुर्गम असे न ठरवता ज्या ठिकाणी कोणतीही चारचाकी गाडी जात नाही व शाळेपर्यंत किमान एक किलोमीटर चालत जावे लागते, अशा शाळांचा दुर्गम म्हणून विचार होणार आहे. पर्जन्याबाबतही केवळ तालुक्याच्या पावसाचा विचार न करता, शाळेपासून जवळ असणाऱ्या पर्जन्यमापक केंद्राचा विचार केला जाणार आहे.
दुर्गम भागांचे निकष दिले आहेत. या निकषांची पार्श्वभूमी विचारात घेऊन त्यात सुधारणा केली आहे. एखाद्या तालुक्यात शिक्षकाची बदली झाली व संबंधित तालुका व शाळा ही सुगम भागातील असेल तर त्या ठिकाणी शिक्षकांना १० वर्षे सेवा द्यावी लागणार आहे. त्यानंतरच ते बदलीस पात्र ठरतील, तर दुर्गम भागात मात्र ३ वर्षे सेवा दिल्यानंतर शिक्षकाची सुगम भागात बदली केली जाते. नवीन निकषात दुर्गम शाळा सुगम झाल्याने तेथील शिक्षकांना बदलीसाठी १० वर्षे वाट पाहावी लागेल. दुर्गम भागातील शैक्षणिक गुणवत्तेसाठीच निकषांची काटेकोर तपासणी केली जात आहे.
-संजयसिंह चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.