
पाण्याचा एकही थेंब वाया न जाता मिळणार शुध्द पाणी
इचलकरंजी (कोल्हापूर) : विजेशिवाय चालणारे(RO system)आणि पाण्याचा एकही थेंब वाया न जाणाऱ्या दर्जेदार आरओ सिस्टीमची येथील युवा संशोधक राहुल गडकरी ( rahul gadkari)यांनी निर्मिती केली आहे. त्यांना या विषयासाठी आयआयटी दिल्लीकडून पीएच.डी.ही मिळाली आहे. नॉन ओव्हन फॅब्रिक (Non oven fabric)या विशेष कापडाचा वापर केल्याने आरओ प्लांटमध्ये पाण्याचे परिपूर्ण शुद्धीकरण होते. त्यामुळे वीज नसलेल्या किंवा अखंड पुरवठा नसणाऱ्या भागात पिण्याच्या शुद्ध पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. या संशोधनाचे भारतीय पेटंटही झाले आहे. (RO-system-providing-pure-water-without-electricity-Creation-research-by -rahul- gadkari-ichalkaranji-kolhapur-news)
डीकेटीई टेक्स्टाईल कॉलेजमधून राहुल यांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीमधून पुढील शिक्षण व संशोधनाला सुरुवात केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २०१८ मध्ये जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार दररोज आठ जणांचा अशुद्ध पाणी पिण्यामुळे मृत्यू होत असल्याचे समोर आले. त्याचवेळी मोठ्या आरओ प्लांटमधून शुद्धीकरणवेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाते. याचा सारासार विचार करून राहुल यांनी शाश्वत संशोधनाला हात घातला. विशेष फॅब्रिक कापडाचा वापर आरो प्लांटमध्ये केला आणि हा प्रयोग यशस्वी झाला.
सध्याचे आरओ प्लांट विजेवरचे आहेत. त्यासाठी कुशल तंत्रज्ञ, देखभालीचाही खर्च येतो. वीज खंडित झाली तर अडचणी येतात. पाणी वाया जाण्याचे प्रमाण जास्त आहे; मात्र राहुल यांचा आरओ प्लांट सोपा, साधा आणि सामान्यांना हाताळता येणारा आहे. त्यांनी पंजाब, हरियाणातील ग्रामीण भागात संशोधनाचा यशस्वी प्रयोग केला. सुमारे दीडशे लोकांना याद्वारे शुद्ध पाणी देऊन चाचणी घेतली. परदेशातील विविध आठ देशांनी त्यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधाचे स्वागत केले आहे.
असे होते पाणी शुद्ध
आतापर्यंत आरओ सिस्टीममध्ये अल्ट्रा व्हायलेट किरणांद्वारे पाण्यातील सूक्ष्म जंतूंना मारले जात होते; मात्र नव्या प्लांटमध्ये सूक्ष्म केशिकाद्वारे भौतिक सिद्धांतानुसार पाणी स्वच्छ होते. विशेष फायबर कापडाच्या धाग्यांमधून पाणी बाहेर गेल्याने पहिल्या प्रक्रियेत गढूळपणा व घनपदार्थ निघून जातील. त्यानंतर दुसऱ्या प्रक्रियेत रासायनिक क्रियेतून उपचारात्मक केलेल्या फायबर कापडातून पाणी तसेच पुढे पुढे गेल्याने सूक्ष्म जिवाणू व जड वस्तू निघून जातात. त्याचवेळी शरीराला आवश्यक खनिजे याव्दारे केलेल्या शुध्दीकरण पाण्यात तशीच राहतात.
केंद्र शासनाकडून ४३ लाखांचा निधी
राहुल यांच्या संशोधनाला भारतीय पेटंट मिळाले. त्यानंतर केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने पुढील कामासाठी त्यांना ४३ लाखांचा निधी दिला आहे. देशभरात विविध ठिकाणी या प्लांटद्वारे काम केले जाणार आहे. तसेच हे आरओ प्लांट बाजार येण्यासाठीही मोठी मदत होणार आहे.
नवीन आरओ प्लांट दररोज सहा लोकांसाठी शुद्ध पाणी देतो. खर्च व जागा यांमध्ये कपात होऊन गावांसाठी हा प्लांट लाभदायक ठरेल. याद्वारे मुबलक स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळणार आहे.
-राहुल गडकरी, संशोधक, आयआयटी दिल्ली
Web Title: Ro System Providing Pure Water Without Electricity Creation Research By Rahul Gadkari Ichalkaranji Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..