कोल्हापूर : केंद्र सरकारने जरी सहकार खाते केले असले तरी त्याचा राज्यातील सहकारावर काहीही परिणाम होणार नाही. सहकार हा विषय राज्यांचा आहे. त्यामुळे केंद्रीय सहकार खात्याला यात हस्तक्षेप करता येणार नाही. ज्या संस्थांची नोंदणी दोन किंवा त्यापेक्षा अधिक राज्यात आहे तेथे केंद्रीय सहकार खाते हस्तक्षेप करू शकते, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी व्यक्त केले.
जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबत मुश्रीफ म्हणाले, ‘‘जिल्ह्यात ७० टक्के लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणात येणार नाही. राज्याला एक नियम व जिल्ह्याला एक नियम असे करता येणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सबुरीने घ्यावे. जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रेट आजही १२ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आजही आपण चौथ्या फेजमध्ये आहोत.
कोल्हापुरातील व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील व्यवसाय सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली होती. त्यांनी काही दिवस मुदत दिली. कोल्हापुरातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी केला पाहिजे. राज्याला एक नियम आणि कोल्हापूर जिल्ह्याला एक नियम असे होणार नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सबुरीने घेणे गरजेचे आहे.’’
भाजपमध्ये आयात झालेल्या नेत्यांमुळे भाजपचे मूळ विचार बाजूला गेले आहेत. भाजपमधील जुन्या नेत्यांपेक्षा आयात झालेलेच मंत्री होत आहेत. त्यामुळे सध्याची भाजप ही कॉंग्रेस विचारांची भाजप झाल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारावर ते बोलत होते.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.