केवळ फलक लावून भागणार नाही

केवळ फलक लावून भागणार नाही

82787
सामानगड : वन विभागाने सामानगडावर आग लावणाऱ्या घटकांवर कारवाईसाठी लावलेला फलक.
..............
केवळ फलक लावून भागणार नाही

सामानगड वनसंवर्धन : वृक्षांच्या वणव्यापासून संरक्षणासाठी कर्मचारी हवा

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : गेल्या सहा दशकांहून अधिक काळ येथील ऐतिहासिक सामानगडावर वनसंवर्धन सुरू आहे. दरवर्षी लाखो रुपये खर्चून वृक्षारोपण व त्यांचे संगोपन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाचा यात पुढाकार असला तरी अलीकडे स्वयंसेवी संस्थाही गडावरील हिरवाई वाढविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नशील आहेत. पंरतु, गेल्या काही वर्षांपासून गडावर विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून वणवे लावले जात आहेत. त्यांना रोखण्यासाठी वनविभागाने कारवाईचा फलक लावला आहे; पण उन्हाळ्यात सुमारे लाखाहून अधिक झाडांच्या देखरेखीसाठी वनविभागाने कर्मचारी ठेवण्याची मागणी निसर्गप्रेमींतून होत आहे.
येथून सात किलोमीटर अंतरावरील सामानगड किल्ला या परिसराचा ऐतिहासिक ठेवा आहे. राजा भोज यांनी १२ व्या शतकात बांधलेला हा किल्ला छत्रपती शिवाजी महारांजांनी डागडुजी करून लढाईचे साहित्य ठेवण्यासाठी वापरला. साहजिकच किल्ल्याचे ‘सामानगड’ असे नामकरण झाले. वैभवशाली इतिहास असूनही केवळ देखभालीअभावी इतिहासजमा होण्याच्या मार्गावरील या किल्ल्याच्या गतवैभवासाठी दुर्गवीर प्रतिष्ठान चिकाटीने झटत आहे. १९६० च्या दशकापासून गडावर वनसंवर्धन सुरू आहे. वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांच्यामार्फत सुमारे तीन लाखांहून अधिक झाडे लावली. अलीकडे निर्सगाला बाधक निलगिरी काढण्यात आली. आजघडीला सुमारे लाखाहून अधिक झाडांमुळे गडावर हिरवाई टिकून आहे.
गडाच्या पठारावर सुमारे साडेसहा हजार देशी झाडे आहेत. गेली काही वर्षे उन्हाळ्यात वणव्यांमुळे गडावरील झाडांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. विकृत मनोवृत्तीच्या लोकांकडून वणवे लावले जात आहेत. त्यामुळे किर्त्येक वर्षे जतन केलेली झाडे वणव्यात नष्ट होत आहेत. दोन वर्षे स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी पदरमोड करून सुमारे लाख रुपयांहून अधिक खर्चून टँकरने या झाडांना पाणी देऊन जीवदान दिले; पण वणवाच पेटू नये यासाठी प्रयत्न करण्याची अपेक्षा निसर्गप्रेमींची आहे. दरवर्षी टँकरवर होणारा खर्च झाडे लावणे आणि संवर्धनासाठी वापरता येईल, असे पर्यावरण क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
..
चौकट..
...तरच झाडे सुरक्षित
दरवर्षीचा हा प्रकार पाहून वनविभागाने कारवाईचा फलकाचा सोपस्कर पूर्ण केला आहे; पण केवळ फलकाने ही विकृत मानसिकता नमणारी नाही. प्रबोधनाबरोबरच फेब्रुवारी ते मे या उन्हाळ्यात वनविभागाने देखरेख करावी, अशी निसर्गप्रेमींची अपेक्षा आहे. तरच वर्षांनुवर्षे जतन केलेला झाडांचा हा ठेवा सुरक्षित राहू शकेल.
....
कोट...
सामानगडावर वनराई वाढण्यासाठी शासनाचे लाखो रुपये खर्ची पडले आहेत. सर्वांच्या प्रयत्नातून त्यातील बहुतांशी झाडे जगली आहेत. त्यामुळे वणव्याचे संकट टाळण्यासाठी या कालावधीत वन विभागाने कर्मचारीच नेमावा.
- श्रीरंग राजाराम, कैलास परीट, पर्यावरण कार्यकर्ते, गडहिंग्लज
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com