आमच्या भवितव्यासाठी मतदान करा

आमच्या भवितव्यासाठी मतदान करा

08452
इचलकरंजी : मालती माने विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पालकांना मतदानादिवशी मताधिकार बजावण्याची आठवण करून देणारे पत्र लिहिले आहे.
----
आमच्या भवितव्यासाठी मतदान करा
इचलकरंजीतील विद्यार्थ्यांची पालकांना पत्रलेखनातून हाक
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : आमचे चांगले भवितव्य घडवायचे असेल, देशाला विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर आई बाबा तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत मतदान केलेच पाहिजे, अशी हाक इचलकरंजीत शालेय विद्यार्थी पालकांना घालताना दिसत आहेत. निमित्त आहे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांचे. प्रांताधिकारी तथा सहायक मतदान अधिकारी मौसमी चौगुले यांच्या पुढाकारातून या उपक्रमामुळे पत्रलेखन आणि सामाजिक संदेशातून मतदान जनजागृती करण्याची अशी दुहेरी बाब पूर्ण झाली आहे.
लोकशाही देशासाठी निवडणूक आणि मतदान प्रक्रियेचे महत्त्व मोठे आहे. प्रत्येक नागरिकाला मिळालेल्या या मतदानाच्या मूलभूत अधिकारातूनच देशाची भविष्यातील पायभरणी केली जाते. मात्र नोंदणीकृत असणाऱ्या मतदारांपैकी प्रत्यक्ष मतदान करणाऱ्या नागरिकांची संख्या यामध्ये तफावत दिसते. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी इचलकरंजी शाळेतील विद्यार्थ्यांनी कंबर कसली आहे. मतदार जनजागृती उपक्रमाचे आयोजन ‘आई-बाबांस पत्र’ या अभिनव उपक्रमांतर्गत शहरातील शाळांमध्ये केले जात आहे. उपक्रमात शाळेतील विद्यार्थी एकाच वेळी पालकांना पत्र लिहून येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याची विनंती करत आहेत.
मतदान करणे हा प्रत्येक प्रौढ नागरिकाचा हक्क तर आहेच सोबत कर्तव्यदेखील आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. तसेच मतदान करून माझे भविष्य उज्ज्वल कराल, अशा आशयाचे पत्र लिहून मुले त्यांच्या आई-बाबांना मतदान करण्याचा हट्ट धरून जनजागृती करत आहेत. प्राथमिक, माध्यमिक शाळांतील विद्यार्थी या मतदान जागृती उपक्रमात सहभागी झाले आहेत. याद्वारे लाखो विद्यार्थी पोस्टकार्ड आणि आंतरर्देशीय पत्रावर भावना व्यक्त करत मतदानाचे महत्त्‍व पत्रातून व्यक्त करत आहेत. हा अभिनव उपक्रम यंदा मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रभावी ठरणार आहे.
----
असे एक पत्र
आई-बाबा तुम्ही रोज काही ना काही कामातच असता. पण ७ मे २०२४ मात्र प्रथम आपले मतदान करून तुम्ही तुमच्या कामाकडे जावे. तुम्ही आदर्श आई-बाबा आहातच, पण ही वेळ तुम्ही आदर्श भारतीय नागरिक म्हणून तुमचा विवेक जागा ठेवत मताधिकार कर्तव्य बजावण्याची आहे.
-पर्वराज लठ्ठे, इयत्ता चौथी
---
भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. ७ मे २०२४ रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या उत्सवामध्ये प्रत्येक मतदाराने सामील होऊन लोकशाही बळकटीकरण्यासाठी योगदान द्यावे, हे अपेक्षित आहे.
-रेखा पाटील, बीएलओ तथा शिक्षक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com