प्रशासन दक्ष; वाढत्या पाण्यावर लक्ष

प्रशासन दक्ष; वाढत्या पाण्यावर लक्ष

Published on

प्रशासन दक्ष; वाढत्या पाण्यावर लक्ष
शिरोळ तालुक्यात नद्यांच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ; बाधित गावांमध्ये घंटागाडीद्वारे सूचना
जयसिंगपूर, ता. २६ : महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील नद्यांच्या इंचाइंचाने वाढणाऱ्या पाणी पातळीवर प्रशासनाचे लक्ष आहे. इशारा पातळीवरच पूरग्रस्तांच्या स्थलांतराला वेग येणार आहे. नदीकाठच्या बाधित गावांमध्ये घंटागाड्यांच्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रशासनामार्फत सूचना दिल्या जात आहेत.
तब्बल दीड महिना लांबलेल्या पावसाने शिरोळ तालुका वगळता धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सध्या कृष्णेच्या पाण्याची पातळी धोकादायक नसली तरी पंचगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पातळी वाढत आहे. धोकादायक स्थिती नसलीतरी तालुक्यातील अठरा गावातील शाळा बंद ठेवून येथे पूरग्रस्तांना निवारा देण्यासाठी प्रशासनाने आदेश काढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शिवाय महापूराची वाट न पाहता ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे, असेही आवाहन प्रशासनामार्फत केले आहे. महापुराचा सर्वाधिक फटका शिरोळ तालुक्यातील शेती आणि घरांना बसतो. याबरोबरच विविध व्यवसायांनाही बसतो. चार नद्या असणाऱ्या शिरोळ तालुक्याला महापुराचा बसणारा फटका लक्षात घेऊन शासनाने महापुराची कारणे शोधून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पूरग्रस्तांमधून होत आहे.
गतवर्षी तालुक्यात महापूर आला नसल्याने नदीकाठच्या शेतांमध्ये उसासह इतर पिके आणि भाजीपाला लावला आहे. पूर आला तरी नदीकाठच्या शेकडो हेक्टर जमिनीतील पिकांना याचा फटका बसतो. दरवर्षी पावसाळा आला की नदीकाठच्या गावांमध्ये महापुराची चर्चा आणि भीती व्यक्त केली जाते. शासन पातळीवर याप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा काही वर्षात तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागणार आहे.
....
तालुक्यातील नद्यांच्या पाणी पातळीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. वाढणाऱ्या पाण्याचा आणि पावसाचा अंदाज घेऊन पूर बाधित गावातील ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या जात आहेत. महापुराशी दोन हात करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. तालुक्यातील ४२ गावांवर प्रशासनाचे लक्ष असून यातील जवळपास सर्वच गावांचे रस्ते महापुरात बंद होऊन या गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याआधीच बाधितांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

- अनिलकुमार हेळकर, तहसीलदार, शिरोळ
- शंकर कवितके, गटविकास अधिकारी, शिरोळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.