
वणवे रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज : जैवविवीधतेचा ऱ्हास होण्याच्या मार्गावर.
04240
वणवे रोखण्याची गरज
निसर्गाची हानी; ठोस उपाय योजावेत
कोनवडे, ता. २३ : उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या प्रकारात वाढ होत चालल्याने, हे प्रकार टाळण्यासाठी जनजागृतीसह ठोस उपाययोजनांची गरज आहे.
रोज कुठे ना कुठे वणवा लागल्याच्या घटना घडतात. वणव्यामुळे अनेक पक्षी, घरटी, सरपटणारे प्राणी, सूक्ष्म जीव यांची जीवितहानी फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होते. ज्या परिसरामधे वणवा लागतो तेथील जमीन जैवविविधतेच्या दृष्टीने पुर्नस्थापित होण्यासाठी बराच कालावधी लागतो. त्यामुळे जंगले विरळ होत आहेत. मानवनिर्मीत वणवे बेकायदा आहेत. नैसर्गिक व अनैसर्गिक वणव्याच्या दाहकतेतून जंगलांना, निसर्गाला वाचवायचे असेल तर सरकारने वणवामुक्त गाव योजना, आमचा गाव वणवामुक्त गाव, ग्रामसभा घेवून वृक्षवल्ली अभियान, वृक्षसंवर्धन मार्गदर्शन, स्थानिक युवकांना वणवा आटोक्यात आणण्याचे प्रशिक्षण देवून वणवाविरोधी सशस्त्र पथक आदी पर्यायाबरोबरच निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी, पर्यावरणप्रेमींनी जनजागृती करावी.
---
कोट
विकृत मानसिकतेपोटी काही ठिकाणी जंगलांना आगी लावल्या जातात. त्यामुळे जैवविविधतेचे नुकसान होते. जनजागृतीबरोबरच कायदेशीर कारवाई केली तरच वणवे लावण्यास आळा बसेल.
- अवधूत पाटील, पर्यावरणप्रेमी
---
वन विभागामार्फत जाळनियंत्रण रेषा मारणेचे काम सुरू आहे. जंगलांना वणवे लावणे कायदेशीर गुन्हा आहे. वणवे लावताना कोणी सापडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.
- मारुती डवरी, वनपाल, कूर