पटसंख्येसाठी शिक्षकांची धडपड : शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती.

पटसंख्येसाठी शिक्षकांची धडपड : शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती.

संग्रहित छायाचित्र वापरावे...
............
पटसंख्या टिकविण्यासाठी शिक्षकांची धडपड

विद्यार्थ्यांना विविध प्रलोभने ः घरोघरी जाऊन पालकांची मनधरणी

अरविंद सुतार : सकाळ वृत्तसेवा
कोनवडे, ता. ७ : एकेका गावात दोन-तीन शाळा असल्याने विद्यार्थी संख्या अपुरी पडत आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त होण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे आपली नोकरी टिकावी, आपल्याच शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी तसेच शाळेचा पट वाढविण्यासाठी माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका व कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.
१५ जूनला नवीन शैक्षणि सत्र सुरू होत आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थी संख्येवर शाळेमधील शिक्षकांची संख्या अवलंबून असल्याने विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता असते. मागील काही वर्षांत भुदरगड तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यामुळे भीतीपोटी सर्व शिक्षक आपल्या शाळेतील शिक्षक किंवा आपणच अतिरिक्त होऊ नये यासाठी पालकांना भेटण्यासाठी घरी फेऱ्या मारत आहेत.
सध्या कूर, मिणचे परिसरात अनुदानित माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यम व उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालये आहेत. मिणचे खोऱ्यात सुमारे पंचवीस ते तीस खेडी असून, प्रत्येक गावात प्राथमिक शाळा आहेत. या गावांतील काही विद्यार्थी गारगोटी, मुदाळ येथे किंवा अन्यत्र ठिकाणी माध्यमिक शिक्षणासाठी जातात. परिणामी या माध्यमिक शाळांना पट टिकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
विद्यार्थी आपल्या शाळेत यावा यासाठी त्यांना कपडे, वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, सायकल तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्या जाण्यासाठी मोफत गाडीची सोय यासारखी प्रलोभने दाखवली जात आहेत. त्यामुळे शिक्षक सकाळी शाळेत, दुपारी शिवारात तर सायंकाळी पालकांच्या घरात असे गावोगावी मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी धडपडताना दिसत असल्याचे चित्र आहे. सुशिक्षित पालक शाळांची गुणवत्ता पाहूनच आपल्या पाल्याला त्या शाळेत प्रवेश घेण्याच्या मनःस्थितीत आहे. हे जरी सत्य असले तरी पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात ही १५ जूनपासून होणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आपल्या शाळेत आल्यावरच पटसंख्या निश्चित होणार आहे हे नाकारता येत नाही.
....
चौकट...
गुणवत्तेकडे लक्ष द्या
सध्या ग्रामीण भागात मुलांसाठी कपडे, वह्या, स्कूल बॅग, सायकल तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्या-जाण्यासाठी मोफत वाहनांची सोय करू, अशी शाळा प्रलोभने दाखवून मुलांचे प्रवेश निश्चित करत आहेत. मात्र, काही शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत साशंकता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ प्रलोभनाला न भुलता तेथील शैक्षणिक गुणवत्तेलाच महत्त्व देऊन प्रवेश घ्यावा, असे मत शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com