
खातेप्रमुख मुंबईत, कर्मचरी प्रचारात
जिल्हा परिषद ... लोगो
...
खातेप्रमुख मुंबईत, कर्मचारी प्रचारात
मुख्यालयात शुकशुकाट; लोकप्रतिनिधी, कंत्राटदारांचे हेलपाटे
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : कणेरी मठावर होणाऱ्या सुमंगलम महोत्सवाच्या तयारीसाठी मंगळवारी (ता. १०) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे बहुतांश खातेप्रमुख हे मुंबई येथे गेले. तर कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी अनेक कर्मचारी तालुक्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेत शुकशुकाट आहे. जिल्हा नियोजनमधून मंजूर कामांची माहिती घेण्यासाठी लोकप्रतिनिधी, कंत्राटदार जिल्हा परिषदेत चकरा मारत आहेत. मात्र, अधिकारी, कर्मचारी नसल्याने चौकशी करायची कोणाकडे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
फेब्रुवारी महिन्यात कणेरी मठावर सुमंगलम महोत्सव होत आहे. याच्या तयारीसाठी मंत्रालयात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील बहुतांश खाते प्रमुख हजर होते. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, पाणी पुरवठाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांच्यासह अनेक खातेप्रमुख मुंबईत होते. मुख्यालयात केवळ सामान्य प्रशासनच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, मुख्य वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, समाजकल्याण अधिकरी दीपक घाटे उपस्थित होते. तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार हे राधानगरी तालुक्यातील लम्पी रोगाचा आढावा घेण्यासाठी तालुक्याच्या दौऱ्यावर होते.
जिल्हा परिषदेचे अधिकारी मुंबई दौऱ्यावर असताना कर्मचारीही कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी तालुक्यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. ही निवडणूक १५ जानेवारीला होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत सध्या शुकशुकाट पहायला मिळत आहे. मार्चअखेर जवळ आल्याने विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी विविध विभागांना भेटी देत आहेत. तर कंत्राटदार बांधकाम विभागाभोवती फिरत आहेत. मात्र, अधिकारी, कर्मचारी नसल्याने त्यांची गोची झाली आहे.