
वाहतुक शाखा करणार कारवाई
‘ट्रॅफिक’ पोलिस आता ‘ॲक्शन मोड’मध्ये
थेट होणार कारवाई ः नियम पाळण्याचे निरीक्षक गिरी यांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १६ : शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी सर्व नियम पाळावे, अन्यथा होणाऱ्या दंडाला आणि शिक्षेला सामोरे जावे लागेल, असे आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांनी केले आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, की करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर, पर्यटनक्षेत्र, सलग सुट्या यामुळे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. येथे पर्यटकांना वाहतूक कोंडीतून मुक्त होण्यासाठी वाहनधारकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ते होत नसल्यास या सप्ताहात तातडीने थेट कारवाई केली जाणार आहे. पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार ही कारवाई केली जाणार आहे.
ट्रिपल सीट, वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, वाहन चालविण्याचा परवाना सोबत नसणे, कर्णकर्कश हॉर्न बसविणे-वाजविणे, कंपनीच्या सायलेंन्सरमध्ये बदल करणे, अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्यास पालकांवर कारवाई केली जाईल. विहित नमुन्यातीलच नंबर प्लेट आवश्यक आहे. दारू पिऊन वाहन चालविणे, सीटबेल्टचा वापर न करणे, मोटारींना काळ्या व गडद काचांचा वापर करणाऱ्यांवर ही कारवाई केली जाणार आहे. तसेच एकेरी मार्गाचे उल्लंघन केल्यावरही कारवाई होणार आहे.