
मार्चअखेर होणारी कामे मार्गी लावा
जिल्हा परिषद ... लोगो
....
मार्चअखेर होणारी कामे मार्गी लावा
समन्वय बैठकीत सीईओंच्या सूचना
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : मार्चअखेरसाठी फक्त अडीच महिने राहिले आहेत. या काळात हाती घेण्यात आलेली सर्व कामे संपवावीत. तसेच ज्या कामांना दोन वर्षांची मुदत आहे, त्या कामांना यावर्षी मंजूर असलेला सर्व निधी खर्च करावा, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिल्या. खातेप्रमुख, गट विकास अधिकारी यांच्या समन्वय बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय माने, डीआरडीए प्रकल्प संचालक सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) मनीषा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) अरुण जाधव तसेच सर्व खातेप्रमुख, गट विकास अधिकारी उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, ‘जिल्हा नियोजन मंडळाकडून प्रत्येक विभागाला निधी मिळतो. हा निधी वेळेत खर्च होणे आवश्यक आहे. काही निधी अजून मंजूर झालेला नाही. मात्र, हा निधी मंजूर झालेनंतर त्याला योग्य त्या यंत्रणेकडून मंजुरी घेणे, समित्यांची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवून ते काम वेळेत कसे पूर्ण होईल, यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. मार्च अखेरसाठी कमी वेळ राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक कामाचे नेटके नियोजन करण्यात यावे. तसेच, पाणी योजनांच्या मंजुरी, स्वच्छता उपक्रमातील सातत्य कसे राहील, याबाबत प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
....