शेतकऱ्यांच्या ठेवींवर 
नातेवाईकांना ४० कोटींचे कर्ज

शेतकऱ्यांच्या ठेवींवर नातेवाईकांना ४० कोटींचे कर्ज

Published on

शेतकऱ्यांच्या ठेवींवर
नातेवाइकांना ४० कोटींचे कर्ज
सोमय्या यांचा मुश्रीफ यांच्यावर आरोप
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ८ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत शासनाकडून ३९ हजार शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ठेव म्हणून ठेवली. त्या रकमेवर आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला ४० कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मुंबई येथे पत्रकार परिषदेत केला आहे.
सोमय्या म्हणाले, ‘‘मुश्रीफ यांच्या व त्यांच्या नातेवाईकांच्या घरावर ईडीने छापा टाकला. यामध्ये साखर कारखाने, काही कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरही ईडीने छापा टाकला. अनेक कागदपत्रे तपासली. यामध्ये शासनाकडून ३९ हजार ५३ शेतकऱ्यांनी मदत मिळाली होती. या प्रत्येक शेतकऱ्याने जिल्हा बँकेत दहा-दहा हजार रुपये मुदत बंद ठेव ठेवली आहे. या एकूण शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याने ५० हजार, एकाने ३० हजार, तर ११ शेतकऱ्यांनी प्रत्येकी २० हजार व ११ शेतकऱ्यांनी प्रत्येकी ५ हजार असे २५ लोकांना ५ ते ५० हजार रुपये ठेव ठेवली आहे. उर्वरित ३९ हजार २८ शेतकऱ्यांनी प्रत्येकाने दहा हजार रुपये ठेव ठेवली आहे. यातून ३९ कोटी ९१ लाख ४१ हजार १२० रुपये एवढ्या ठेवी जमा केल्या आहेत. याच ठेवींवर मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांच्या व सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या नावावर ४० कोटी रुपये कर्ज दिले आहे. सरकारकडून मिळालेल्या रकमेचा गैरवापर केल्याचे दिसून येत आहे.’’
‘‘कर्जासाठी दिलेल्या रकमेचा एकही कागद नाही. ठेवीच्या बदल्यात कर्ज दिल्याचे म्हटलेले नाही. शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. ताबडतोब विशेष लेखापरीक्षण व्हावे, संचालक मंडळ बरखास्त करावे व सहकार आयुक्तांनी या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी सोमय्या यांनी केली आहे.

जिल्हा बॅंक संचालक
मंडळ बरखास्त करा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकार मंत्री अतुल सावे यांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून विशेष लेखापरीक्षण करावे. शेतकऱ्यांची फसवणूक केली म्हणून सहकार आयुक्तांनी संबंधित संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशीही मागणी त्यांनी केली.

मुश्रीफ यांचा फोन बंद
किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया घेण्यासाठी आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संर्पक करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा मोबाईल बंद होता. दरम्यान, ते मुंबईहून येत असून रेल्वेमध्ये असतील, त्यामुळे फोन लागत नसावा, असे जिल्हा बँकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.