
दीक्षांत समारंभ स्थगितीने विद्यार्थ्यांची अडचण नको
दीक्षान्त समारंभ स्थगितीने
विद्यार्थ्यांची अडचण नको
पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी; विद्यापीठाने निर्णय घ्यावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर ः सर्व तयारी झाली असताना शिवाजी विद्यापीठाने अचानक दीक्षान्त समारंभ स्थगितीचा निर्णय सोमवारी जाहीर केला. त्याचा विद्यार्थ्यांना फटका बसू नये. नोकरी अथवा उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही, याची दक्षता विद्यापीठाने घ्यावी. त्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करावी. त्यादृष्टीने विद्यापीठाने निर्णय घ्यावा, अशी मागणी विद्यापीठ संबंधित घटकांनी केली.
दीक्षान्त समारंभ स्थगित झाल्याने त्याचा फटका पर्यायाने विद्यार्थ्यांना बसणार आहे. दीक्षान्त समारंभाशिवाय पदवी प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे नोकरी अथवा पुढील उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या पदवीधर विद्यार्थ्यांची अडचण होणार आहे. अशा विद्यार्थ्यांना किमान तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था विद्यापीठाने त्वरित सुरू करावी. त्याबाबत अधिकार मंडळांची मान्यता घेऊन लवकर कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी विद्यापीठ संबंधित घटकांनी केली आहे.
दरम्यान, कर्मचारी संघाने सन १९९८ मध्ये सेवक संघाच्या बेमुदत संपातही पदवीदान समारंभ यशस्वीपणे पार पाडला. विद्यापीठाच्या अस्मितेला धक्का पोहचू दिला नाही. विद्यापीठाने १६ फेब्रुवारी रोजी होणारा पदवीदान समारंभ हा बिनबुडाच्या कारणास्तव स्थगित करून विद्यापीठाच्या अस्मितेला गालबोट लावले आहे, अशी नाराजी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी संघातर्फे संस्थापक अध्यक्ष वसंतराव मगदूम यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी पदवी प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यासाठी पदवीदान समारंभ नियमानुसार डिसेंबरपूर्वी घेण्याचा आहे; परंतु अलीकडील कालावधीत जानेवारीत हा समारंभ घेऊन विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचे मगदूम यांनी सांगितले.
...
दोन ते तीन दिवसांत कार्यवाही करावी
अंतिम वर्षातील शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी अथवा पुढील शिक्षणासाठी पदवी प्रमाणपत्र लागते. ते मिळाले नाही, तर त्यांचे नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने अशा विद्यार्थ्यांना दोन ते तीन दिवसांत पदवी प्रमाणपत्र वितरित करण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी युवासेना (बाळासाहेबांची शिवसेना) कोल्हापूर शहरप्रमुख मंदार पाटील यांनी केली.