
नियमित पाणीपुरवठा करा; अन्यथा रस्त्यावर उतरू
84352
कोल्हापूर : पाणीपुरवठा बैठकीसाठी शहर व जिल्हा नागरी कृती समितीचे कार्यकर्ते रिकाम्या घागरी घेऊन महापालिकेत आले होते.
नियमित पाणीपुरवठा करा;
अन्यथा रस्त्यावर उतरू
कृती समितीचा इशारा; रिकाम्या घागरी घेऊन पालिकेत
कोल्हापूर, ता. २१ : उन्हाळा सुरू झाला असून शहराला नियमित, पुरेशा दाबाने पाणीपुरवठ्यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध काम करावे, अन्यथा रास्ता रोकोबरोबरच निष्क्रिय अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने महापालिका प्रशासनाला आज दिला.
समितीचे कार्यकर्ते रिकाम्या घागरी घेऊन प्रशासकांच्या कार्यालयात गेले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जलअभियंता हर्षजित घाटगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पाणीपुरवठा विभागाची अनास्था मांडण्यात आली. यावेळी रमेश मोरे, अशोक पोवार यांनी प्रशासनाचे काम नियोजनशून्य असल्याचे सांगितले. तसेच सुभाषनगर केंद्रात राखीव पंप नाही, पंप किती वेळा बंद पडला, काय काम केले, कामाची गॅरंटी किती हे गुलदस्त्यात आहे. बिल काढण्याचे काम हंगामी कर्मचारी करतो. नवीन आपटेनगर केंद्रातील राखीव पंप कायम बंद असतो. पाईपलाईन दुरुस्तीचे नियोजन नाही. जितका पाणीपुरवठा बंद राहील तितके काही अधिकाऱ्यांचे भले होत आहे. एकाही उपजल अभियंत्याला भागात किती इंच पाईप आहे, व्हॉल्व्ह कोठे आहे याची माहिती नाही. कंत्राटी कामगारांकडून खासगी पाईप बदलणे, नवीन कनेक्शनसाठी १० मीटरपैकी तीन ते चार मीटरचे पैसे भरणे अशी स्थिती आहे. शहरात उंच टाक्या भरतच नाहीत. त्याच्या मुख्य पाईपलाईनलाच क्रॉस कनेक्शन आहेत. ती शोधून त्वरित बंद करावीत, असेही सांगितले. यावेळी चंद्रकांत सूर्यवंशी, विनोद डुणूंग, राजू मालेकर, सी. एम. गायकवाड, चंद्रकांत पाटील, प्रकाश आमते, लहुजी शिंदे, रणजीत पवार, सुनीता पाटील, लता जगताप, पूजा पाटील, ऐश्वर्या नार्वेकर, सदा कोळेकर, सचिन बिरजे आदी उपस्थित होते.