
राजाराम हरकती
‘राजाराम’च्या हरकतींवर मंगळवारी सुनावणी
१९ हरकती दाखल : दोन टप्प्यात एकाच दिवशी सुनावणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २५ ः कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या प्रारूप मतदार यादीवर दाखल झालेल्या हरकतींवर मंगळवारी (ता. २८) सुनावणी होणार आहे. या यादीवर १९ हरकती दाखल झाल्या आहेत. दोन टप्प्यात एकाच दिवशी यावर सुनावणी होणार आहे.
‘राजाराम’ची प्रारूप यादी १३ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर २२ फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या होत्या. या काळात १९ हरकती दाखल झाल्या आहेत. त्यात यापूर्वी हरकत घेऊन अपात्र ठरवलेल्या १३९९ सभासदांविरोधातही पुन्हा हरकत दाखल झाली आहे. याशिवाय संस्था गटातील शौमिका अमल महाडीक यांच्या नावावर असलेल्या संस्थेच्या ठरावावर आक्षेप घेताना महाडिक त्या संस्थेच्या सभासद नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कारखान्याची अंतिम मतदार यादी ९ मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. तत्पूर्वी दाखल हरकतींवर सुनावणीची प्रक्रिया होणार आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी पहिल्या दहा तर दुपारी उर्वरित नऊ हरकतींवर सुनावणी होईल. या सुनावणीत मयत २८९९ सभासदांची नावे कमी करणे, नावांतील बदल किंवा चुकीच्या नावाची दुरूस्ती एवढीच प्रक्रिया होणार असल्याचे यापूर्वीच प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सुनावणी विषयी उत्सुकता आहे.