
अंबाबाई मुर्ती संवर्धन
85959
कोल्हापूर ः श्री अंबाबाईच्या मूर्तीचे तत्काळ संवर्धन व्हावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मंगळवारी देण्यात आले.
श्री अंबाबाई मूर्तीचे
लवकरच पुन्हा संवर्धन
राहुल रेखावार; राज्य पुरातत्त्व विभागाकडून पाहणी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाली असून, राज्य पुरातत्त्व विभागाकडून त्याबाबत पाहणी करण्यात आली. याबाबतची माहिती घेऊन केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या रासायनिक संवर्धन प्रक्रिया विभागाचे अधिकारी लवकरच येऊन पाहणी करून संवर्धनाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आज देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘मूर्तीच्या पुन्हा संवर्धनासाठी मागणी होऊ लागल्यानंतर आज सकाळी राज्य पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वहाणे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सद्यस्थितीबाबत माहिती दिली. त्यानुसार आता पुढील कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. पुन्हा संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर सहा महिन्यांला मूर्तीची पाहणी करून उपाययोजना राबवल्या जाणार आहेत.’’
संवर्धनाबाबत अजिबात चालढकल नको
श्री अंबाबाई लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, मूर्तीच्या संवर्धनाबाबत अजिबात चालढलक नको. मूर्तीची झीज तत्काळ थांबवण्यासाठी संवर्धनाची प्रक्रिया पारदर्शकपणे करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी रेखावार यांना देण्यात आले. संवर्धनाबाबत तत्काळ कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शासनाने अंबाबाई विकास आराखड्यासाठी ऐंशी कोटींच्या निधीची घोषणा केली; प्रत्यक्षात आठ कोटींचाच निधी आला. मंदिर परिसरातील विकासकामे आणि रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवताना या क्षेत्रातील जाणकारांना विश्वासात घेतले जावे, असेही जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले. शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शशिकांत बिडकर, दत्ताजी टिपुगडे, गोविंद वाघमारे, कमलाकर जगदाळे, रुपेश रोडे, विनायक केसरकर, राजू जाधव, अभिजित बुकशेठ, प्रवीण पालव यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
नवरात्रोत्सवापूर्वी मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली, त्यावेळी ती घाईगडबडीने केली गेली. याबाबत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना भेटल्यानंतर त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. प्रक्रियेबाबतची माहिती अगोदर भाविकांना दिली गेली नाही, असा आक्षेपही यावेळी व्यक्त झाला. त्यानंतर संबंधित कामावेळी तत्काळ संवर्धन करणे आवश्यक होते; मात्र ती नियमानुसारच पार पडल्याचे श्री. रेखावार यांनी स्पष्ट केले.