
अंगणवाडी इमारत बांधकामात परस्पर बदल
जिल्हा परिषद ...
...
अंगणवाडी इमारत बांधकामात परस्पर बदल
शिस्तभंग कारवाईचे सीईओंचे आदेशः अर्धवट इमारतींचा प्रश्न मात्र कायम
सदानंद पाटील, सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.३: सांगली, सातारा या शेजारील जिल्ह्यांतील अंगणवाडीची कामे दिलेल्या निधीतून पूर्ण केली जात आहेत, मात्र जिल्ह्यातील ठराविक तालुक्यांनी दिलेल्या रकमेत काम पूर्ण होत नसल्याचे सांगत टाईप प्लॅनमध्येच बदल केला आहे. थेट शासनाचे अधिकार वापरून उपअभियंत्यांनी केलेल्या या प्रकाराचे पडसाद उमटू लागले आहेत. ज्या तालुक्यात टाईप प्लॅनमध्ये बदल केला आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे बांधकाम विभाग हादरुन गेला आहे.
महिला बालविकास विभागाकडून अंगणवाडी बांधकामाचा मसुदा, तसेच त्याचा टाईप प्लॅन तयार केला आहे. गतवेळच्या म्हणजेच २०२१,२२ सालात अंगणवाडीसाठी ८ लाख ५० हजार रुपयांची तरतूद केली आहे. यानंतर शासनाने हीच रक्कम ११ लाख २५ हजार इतकी केली आहे, मात्र गतवेळी मंजूर कामे ही ८ लाख ५० हजार रुपयात पूर्ण करणे आवश्यक आहे. आजरा, गडहिंग्लज, राधानगरी तालुक्यातील बहुतांश अंगणवाडीची कामे पूर्ण झाली आहेत, मात्र इतर तालुक्यांत ८ लाख ५० हजार रुपयांत अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण होत नसल्याचे बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे टाईप प्लॅनमध्ये बदल केला आहे.
दिलेल्या रकमेत काम पूर्ण करत असताना अर्धवट गिलावा, फरशीची कामे अपूर्ण, दारे-खिडक्यांशिवाय इमारती पूर्ण केल्या आहेत. अशा अर्धवट कामांचा निधी महिला बालकल्याण विभागाने रोखला आहे. अर्धवट इमारती ताब्यात घेऊन त्यांचे बिल आदा करावे व उर्वरित कामास तरतूद करण्याची मागणी बांधकाम विभागाने केली आहे. त्यामुळे या दोन्ही विभागांतील वाद आता कारवाईच्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे, मात्र या वादात अर्धवट कामांचे पुढे काय? जी कामे पूर्ण झाली आहेत त्यांच्या बिलाचे काय? अर्धवट कामांसाठी निधी लागणार कसा, यावरची चर्चा मात्र ठप्प झाली आहे.
...
कोट
‘बांधकाम विभागातून टाईप प्लॅनमध्ये बदल करून अर्धवट इमारत बांधकाम केले आहे. या अर्धवट अंगणवाडी इमारतींचे बिल काढण्यासाठी आग्रह केला जात आहे. इमारतीला दारे, खिडक्या बसवलेल्या नाहीत. रंगकाम झाले नसून, फरशीही बसवण्यात आलेली नाही. अशा इमारतीत अंगणवाडीची मुले कशी बसू शकतात?
शिल्पा पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी
...
‘दिलेल्या निधीत टाईप प्लॅनप्रमाणे काम करता येत नाही. त्यामुळेच त्यात बदल केला आहे. तांत्रिक कारणामुळे संपूर्ण इमारतीचे काम ८ लाख ५० हजार रुपयांत होत नाही. त्यामुळे उर्वरित निधीची तरतूद केल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही. टाईप प्लॅनमध्ये बदल झाला तेव्हा कोणीच तक्रार केली नाही.
सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता, बांधकाम